मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेशी गद्दारी करणारे हे बंडखोर नाहीत तर हरामखोर आहेत, नमकहराम आहेत. शिवसेनेसोबत ते माझे वडीलही चोरायला निघाले असल्याची कडवट टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर केली आहे. मुंबईत काळाचौकीत शिवसेना कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रामेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे पुढे म्हणालेत की, ५६ वर्षांपूर्वी शिवसेना स्थापन केली तेव्हा हाच तो परिसर आहे. या मनगटात ताकद ज्या शिवसेनेने दिली ते आता शिवसेना गिळायला निघाले आहेत. त्यांचे जे करता करविते आहेत, महाशक्ती, म्हणजे कळसुत्री बाहुल्यांचे संचालक. त्यांना शिवसेना संपवायची आहे. त्यांना मुंबईवरचा भगवा झेंडा उतरवायचा आहे आणि आपला ठसा उमटवायचा आहे. आजपर्यंत संकटं अनेक आली, पण ज्यावेळेला संकटं आली त्या त्या वेळेला संकटांना गाळून शिवसेना जोमाने उभी राहिलेली आहे. अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. पण आता जो प्रयत्न आहे तो शिवसेना संपवण्याचा प्रयत्न आहे हे लक्षात घ्या. कारण जे सगळे कायदेतज्ज्ञ सांगत आहेत. हे जे फुटलेले आहेत त्यांना कुठल्याना कुठल्या पक्षात जाण्यास खेरी नाही. आणि कुठल्या पक्षात जाणार आहेत? त्यांना काल एका पक्षाने ऑफर दिली आहे. किती जणांचा केमिकल लोच्चा झाला असेल सांगता येत नाही.
तुमच्यात हिंमत असेल तर शिवसेना प्रमुखांचा, माझ्या वडिलांचा फोटो लावू नका, तुमच्या हिंमतीवर मतं मिळवा. असे ते म्हणाले. प्रत्येकाला आईवडील प्यारे असतात. जे फुटून गेलेले आहेत, त्यातल्या सुदैवानं ज्यांचे आईवडील सोबत आहेत, त्यांनी त्यांना सोबत घेऊन सभा घ्याव्या आणि मतं मागावी. असा टोलाही त्यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे. शिवसेनेसोबत ते माझे वडीलही चोरायला निघाले आहेत, अशी टीका त्यांनी बंडखोर आमदारांवर केली. अशा लोकांच्या हातात महाराष्ट्र, मुंबई आणि तुमचं आयुष्य तुम्ही देणार आहात का? असा सवालही त्यांनी मुंबईकरांना केला आहे. कोर्टावर माझा विश्वास आहे. पण आता त्यांनी निवडणूक आयोगाला सांगत आहेत आम्हीच खरी शिवसेना. आपल्याला एक गोष्ट करावी लागेल प्रत्येक पदाधिकाऱ्याचं शपथपत्र, प्रत्येक शिवसैनिकांची सदस्य नोंदणी. यासाठी आग्रह धरण्याची गरज उद्धव यांनी व्यक्त केली आहे. वाढदिवसाला भेट द्यायची असेल तर मला फुलांचे गुच्छ नकोत. मला सदस्यांच्या अर्जांचे आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे हवेत. याचं कारण आता त्यांनी प्रोफेशनल एजन्सी कामाला लावल्या आहेत. ही लढाई पैसा विरुद्ध निष्ठा अशी आहे. तुम्ही कितीही पैसा ओतला तरी हे माझं शिवसैनिकांचं वैभव त्यांना पुरुन उरेल,असेही ठाकरे म्हणालेत.
आता आपल्याला सामान्यातून असामान्य लोकं घडवायची आहेत. ही माणसे सामान्य आहेत पण त्यांची ताकद असामान्य आहे. त्यांना अजून कळलेले नाही की त्यांनी कोणाशी पंगा घेतलेला आहे. ५६ वर्षापूर्वी शिवसेना स्थापन झाली तेव्हा आपल्या मनगटांमध्ये ताकद आहे याची जाणीव बाळासाहेबांनी करुन दिली नसती तर आपली मनगटे पिचून गेली असती. ज्या सगळ्या दगडांना शिवसेनेने शेंदूर फासला होता ते आता शिवसेना संपवायला निघालेले आहेत. त्यांचे जे कर्तेकरविते आहेत त्यांना शिवसेना संपवायची आहे. त्यांना मुंबईवरचा आपला ठसा पुसून टाकायचा आहे आणि त्यांचा ठसा उमटवायचा आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला पण आजचा प्रयत्न शिवसेना संपवण्याचा आहे हे लक्षात घ्या. कायदे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आता फुटलेल्या आमदारांना कोणत्या ना कोणत्या पक्षात जाण्याशिवाय पर्याय नाही. काल एका पक्षाने त्यांना ऑफर दिली आहे. त्यांना एकतर शिवसेना संपवायची आहे आणि शिवसेना आणि ठाकरे हे नाते तोडायचे आहे. नातं तोडायचे असेल तर बाळासाहेबांचा फोटो लावू नका. हिंमत असेल तर स्वतःच्या नावाने मतं मागा. जे फुटून गेले आहेत त्यांनी आई वडीलांना सोबत घेऊन सभा घ्याव्यात आणि मतं मागावी. तुम्हाला पक्षही चोरायचा आहे आणि वडीलही. तुम्ही दरोडेखोर आहात. अशा लोकांच्या हातात तुम्ही मुंबई, महाराष्ट्र आणि तुमचं आयुष्य देणार आहात का? ,असाही सवाल उद्धव ठाकरेंनी केला.