मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष काही कमी होताना दिसत नाहीये. याच दरम्यान आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या राज्यात काही लोकांचं राजकीय पर्यटन सुरू आहे, असं सांगतानाच जुने व्हायरसही परत आले आहेत. या व्हायरसचा बंदोबस्त करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “पोस्ट कोविड हा जो प्रकार आहे की, आहे ते टिकवलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे चांगल्या गोष्टी वाढवायला हव्यात. दुर्दैवाने काय होतं, आजचं जे वातावरण आहे, थोडं सावधानतेने मी पाऊल टाकत आहे. अजूनही थोडे दिवस थांबायला हवं, कोरोनाचं संकट खरचं गेलंय का? अजून पूर्ण गेलेलं नाहीये. थोडंस आहे. काही-काही तर जुने व्हायरस पण परत आले आहेत. आणि जुने व्हायरस सुद्धा कारण नसताना साईड इफेक्टस आणत आहेत.
या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे.” पर्यटन हे असं क्षेत्र आहे, सर्वांना फिरण्यासाठी आवडतं. काहीजणांचं राजकीय पर्यटन असंत इथून तिथं आणि तिथून इथे. काहीजण प्रवासी असतात ते वेगवेगळी ठिकाणे पाहत असतात. मधल्या काळात केंद्र सरकारने एक व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली होती त्यात त्यांनी सांगितलं होतं, सावधनता बाळगा. पर्यटन स्थळावर इतकी गर्दी होत आहे की, पुन्हा हे संकट येऊ शकतं असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवर निशाणा साधला आहे.