मुंबई (वृत्तसंस्था) भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांचं भाषण ऐकून मी अवाक झालो आहे. कारण एकीकडे ते आपल्या वयाच्या थोरल्यापणाची मानाची अपेक्षा ठेवतात अन् दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात,” अशी टीका पडळकर यांनी केली आहे.
“पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रित न केल्यामुळे हताशपणे बोलले असतील. आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवरती यांचा राग यामुळेच आहे, की माझ्यासारखा धनगराचा पोरगा असो की शेतकऱ्यांचा सुपुत्र सदाभाऊ असो की वंचितांचा पुत्र राम सातपुते असो यांना देवेंद्र फडणवीसांनी सत्तेच्या प्रवाहात पुढे आणले. त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रस्थापितांचा तीळपापड होतोय. म्हणूनच आमचे बहुजन हितचिंतक देवेंद्र फडवणीस यांच्या नजरेत खुपतात,” अशी टीका पडळकरांनी केली.
“मी पवार साहेबांना सांगू इच्छितो, महाराष्ट्रात २०१९ मध्ये फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाचे १०५ आमदार तर शिवसेनेचे ५६ असे एकूण १६१ आमदार महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना पुन्हा आणण्याकरताच निवडून दिले होते. पण आपल्या नेतृत्वात साताऱ्यात पावसात भिजूनसुद्घा फक्त ५४ च आमदार निवडून आले. त्यामुळे जनतेने तुम्हालाच निवडून दिले अशा खोट्या थापा मारणं बंद करा,” असं पडळकर म्हणाले.
आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही पण तुमच्या पक्ष स्थापनेपासून गेल्या ३० वर्षात तुम्हाला आजपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही. सत्तेसाठी पडती भूमिका घेणं सोपं असतं पण लोकहितासाठी सक्षम भूमिका घेणं महाकठीण असतं,” असंही ते म्हणाले.