मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीत काल पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दहशतवाद्यांचा मुंबईची लोकल उडवण्याचा प्लॅन असल्याचं उघड झाल्याने दिल्ली पोलीस आयुक्त राकेश अस्थाना थेट मुंबईत दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री वळसे -पाटील यांनी तातडीने पोलिसांची बैठक बोलावली आहे.
दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. दिल्ली पोलिसांनी काल ६ दहशतवाद्यांना अटक केली. प्राथमिक तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात आणखी दहशतवादी असणाऱ्याची शक्यता तपाय यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यासोबत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी काही जणांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. त्यानुसार त्यांचा मुंबई लोकलला टार्गेट करण्याचा इरादा होता, अशी माहिती समोर आली आहे.
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी दोघांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलं होतं. त्यानंतर भारतात विविध ठिकाणी दहशतवाद्यांनी रेकी केली होती. ऐन सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ला करण्याची तयारी या दहशतवाद्यांनी केली होती. याशिवाय देशात विविध ठिकाणी याआधीच स्फोटकं पाठविण्यात आलेली असल्याची शक्यताही चौकशीतून व्यक्त करण्यात आली आहे. एका दहशतवाद्याला मुंबई-दिल्ली रेल्वेचं तिकीट काढून देणाऱ्यालाही एटीएसनं ताब्यात घेतलं आहे.
दिल्ली पोलिसांनी पकलेल्या दहशतवाद्यांकडून दिल्लीसह मेट्रो शहरात बॉम्बस्फोट करण्यात येणार होते. ओसामा व जीशन बॉम्ब बनविण्याची तयारी करत होते. या दोघांनी दोन आयईईडीही बनवल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आधी दोघांना दिल्लीतून तर समीर नावाच्या इसमाला उत्तर प्रदेशातील कोटामधून आणि तिघांना राजस्थान येथून ताब्यात घेण्यात आले. या सहापैकी एक जण महाराष्ट्रातील असल्याचे समजते. सणासुदीच्या काळात आणि निवडणुकांचा प्रचार सुरू झाल्यावर काहींच्या हत्या व विशिष्ट ठिकाणी स्फोट करण्याचा यांचा कट होता, असे पोलिसांनी सांगितले. झीशान आणि ओसामा या दोघांना मस्कतमार्गे पाकिस्तानात पाठवण्यात आले होते. तिथे त्यांना स्फोट घडवणे आणि शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. एके ४७ रायफल कशी चालवावी, हेही शिकविले होते. हे प्रशिक्षण १५ दिवसांचे होते.
दिल्लीत जेरबंद केलेला दहशतवादी मुंबईतील
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया (४७) हा मुंबईतील सायन भागातील रहिवासी असून टॅक्सीचालक आहे. त्याच्या घरी कुटुंबियांची एटीएस तसेच गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. शेख हा सायन येथील सोशननगरमधील केलाबखार परिसरातील खोली क्रमांक १८५ मध्ये दोन मुली आणि पत्नीसोबत येथे राहतो. त्याच्या एका मुलीचे पदव्युत्तर शिक्षण झाले असून, दुसरी मुलगी शाळेत शिक्षण घेत आहे.
डी गँगशी संबंध?
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यातील दोन दहशतवादी डी- गँगशी संबंधित असल्याचीही माहिती मिळतेय. सध्या देशात सणांची धूम आहे. गणेशोत्सव, नवरात्री या सणांमुळे देशात अनेक ठिकाणी गर्दी होते. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवण्याची दहशतवाद्यांची तयारी होती.