मुंबई (वृत्तसंस्था) रत्नागिरी, सिंधुदुर्गासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपले आहे. त्यातच आता हवामान विभागाने राज्यात एकट्या पालघरला रेड अलर्ट दिला आहे. तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यातल्या जवळपास ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले असून अनेक ठिकाणी रस्ते, घरे, दुकानांत पाणी शिरल्याचं पहायला मिळत आहे. तर कुठे मुसळधार पावसामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर आणखी दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. आज ज्या ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, जालना आणि अकोला जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.