जळगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच वापर वाढवून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे यासाठी पिक स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेच्या कार्यपद्धतीत शासनाकडून सुधारणा करण्यात आली असल्याचे कृषी संचालक विकास पाटील यांनी कळविले आहे.
खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भूईमूग, सूर्यफुल या ११ पिकांचा, तर रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ या सहा पिकांचा समावेश करण्यात आला आहे. पीकस्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शेतक-यांकडे पिकाखालील किमान १० आर. (०.१० हेक्टर) सलग क्षेत्र असणे आवश्यक आहे. पिक स्पर्धा ही तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे. ज्या पिकाखालील लागवड क्षेत्र १००० हेक्टर किंवा त्याहून अधिक आहे, अशा सर्व पिकांकरिता पीक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. स्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोजित केली जाणार आहे. पीक स्पर्धेसाठी तालुकापातळीवर सर्वसाधारण गटातील किमान १० स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान ५ पाच स्पर्धकांचा सहभाग आवशक्य असून त्याकरिता भाग घेण्यासाठी रुपये ३०० प्रति शेतकरी प्रति पीक या प्रमाणे प्रवेश शुल्क राहणार आहे. तालुका पातळीवरील स्पर्धेच्या निकालावरून पुणे जिल्हा, विभाग व राज्य पातळीवरील बक्षिसे जाहीर केली जाणार आहे. एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहे. रब्बी हंगामासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२० असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.