मुंबई (वृत्तसंस्था) भाजप आमदार राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तांडव वेबसिरीजच्या निर्मात्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिस तयार आहेत. पण महाराष्ट्र सरकार त्यांना रोखत असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. त्यासाठी राम कदम यांनी घाटकोपरच्या चिराग नगर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं होतं. अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
तांडव वेबसिरीजचा वाद वाढल्यानंतर निर्मात्यांनी याबाबत माफीनामा सादर केला आहे. मात्र, तरीही हा वाद शांत होताना दिसत नाहीये. आता केवळ माफीने काम चालणार नाही, त्या सर्वांना आम्ही तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही, असा पवित्राच राम कदम यांनी घेतला होता. तसंच, महाराष्ट्र सरकार मुंबई पोलिसांना तक्रार दाखल करण्यापासून रोखतेय, असा आरोप करत त्यांनी सरकार विरोधात आंदोलनाची हाक दिली होती. घाटकोपर येथील पोलीस स्टेशनच्या बाहेर राम कदम आणि त्यांच्या समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं होतं. तसंच, सरकारविरोधात घोषणाबाजीही सुरु केली होती. त्याचवेळी पोलिसांकडून राम कदम यांना ताब्यात घेण्यात आलं. आमचा आवाज दाबण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मला व काही राम भक्तांना ताब्यात घेतलं. अजून किती जणांचा आवाज दाबणार आहात?, ज्यांनी हिंदू देवी देवतांचा अपमान केला ते एसीमध्ये बंगल्यात आहेत आणि न्यायाची मागणी करणारे तुरुंगात, असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे. तांडव वेबसिरीजची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. अभिनेता झिशान आयुब याच्यावर चित्रीत एका दृश्यावर काहींनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या दृश्यामुळं हिंदू देवी-देवतांचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसंच, निर्मात्यांनी माफी मागावी अशी मागणीही जोर धरु लागली आहे.
अली अब्बास जफर दिग्दर्शित तांडव वेब सिरीज विरोधात अनेक तक्रारी दाखल होत आहेत. सोमवारी अली अब्बास जफरने एक निवेदन काढून हिंदू संघटनांची माफी मागितली आहे. तरीही तांडवच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कारण, आता गौतम बुद्ध नगरातील रबुपुरा पोलिस स्टेशनमध्ये निर्माते आणि कलाकारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या वेब सीरीजमध्ये धार्मिक भावना दुखावल्या असून उत्तर प्रदेश पोलिसांची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.