मुंबई (वृत्तसंस्था) प्रत्येक वेळी बंदुकांनीच काम होते असे नाही. दिल्लीच्या सीमेवर आपल्याच शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवून मारले जात आहे, तर कश्मीर सीमेवर अतिरेकी आमच्या सैनिकांचे बळी घेत आहेत. तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा ! त्याशिवाय पर्याय नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनानं सध्या दिल्ली दणाणून गेली आहे. कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीतील बुराडी मैदानात ठाण मांडलं आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठ्याकाठ्या, थंड पाण्याचे फवारे, अश्रुधुराची नळकांडी फोडण्यात आली. शेतकऱ्यांच्या आंदोलनात खलिस्तानी घुसल्याचा दावाही भाजपच्या नेत्यांनी केला. शेतकऱ्यांविरोधात सरकार करत असलेल्या या बळाच्या वापरामुळं देशात संतापाचं वातावरण आहे. ही संधी साधून शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ‘एखादा विषय हातातून निसटला की ‘हिंदुस्थान-पाकिस्तान’ हा खेळ सुरू करायचा ही त्यांची हातचलाखी ठरलेलीच आहे. शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी जिद्दीने लढतो आहे. तो पंजाबचा आहे म्हणून त्यास देशद्रोही, खलिस्तानवादी ठरवले जात आहे. हा विचार दळभद्रीपणाचेच लक्षण आहे,’ अशी घणाघाती टीका शिवसेनेनं केली आहे.
“सरदार पटेल हे पोलादी पुरुष होतेच. पोलादी पुरुषाचा अतिभव्य पुतळा नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी गुजरातमध्ये उभा केला. सरदार पटेल हे शेतकऱ्यांचे नेते होते. ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी केलेली साराबंदी चळवळ, बार्डोलीचा सत्याग्रह निर्णायक ठरला, शेतकऱ्यांचे आंदोलन उभे करून त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीस जेरीस आणले, पण दिल्लीच्या सीमेवर आणि देशाच्या सीमेवर सध्या जो अंदाधुंद प्रकार सुरू आहे, त्यामुळे पोलादी पुरुषाच्या पुतळ्याच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या असतील,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.
















