जळगाव (प्रतिनिधी) – पाडळसरे धरणाच्या बंद पडलेल्या कामाला अजितदादांनीच निधी देऊन गती दिली आहे. त्यामुळे धरणात पाणी अडविता आले आणि आज धरणात मुबलक पाणीसाठा आपल्या दिसतो आहे. त्यामुळे धरणाला “अजित पवार निम्न तापी प्रकल्प” असे नाव देण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार कृषीभूषण साहेबरावदादा पाटील यांनी केली.
अपक्ष आमदार म्हणून भेट घेतल्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अपेक्षा विचारल्या असता, मी कोणतेही मंत्रिपद, महामंडळ, समिती किंवा सत्तेतील पद नको असल्याचे स्पष्ट सांगितले. मात्र, पाडळसरे धरणाचे रखडलेले काम पूर्ण करून द्यावे, अशी एकमेव मागणी केली होती. या मागणीची दखल घेत अजित पवार यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला आणि धरणाच्या कामाला गती मिळाली. माझ्या कार्यकाळात झालेला जलसाठा आजही कायम असून, त्याचे संपूर्ण श्रेय अजित पवार यांनाच जाते. त्यामुळे या प्रकल्पाचे नामकरण “अजित पवार तापी निम्न प्रकल्प” असे करण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार तथा कृषीभूषण साहेबरावदादा पाटील यांनी केली. छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित श्रद्धांजली सभेत अखिल भारतीय सर्वसमावेशक संस्था, विविध संघटना आणि नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी ही मागणी व्यक्त केली.
यावेळी पुढे बोलताना साहेबराव पाटील म्हणाले की, अमळनेर मतदारसंघ प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून शेतकरी सध्या कर्जबाजारीपणाच्या समस्येला सामोरे जात आहेत. विद्यमान शासनाने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचे आश्वासन दिले होते. यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती अभियान व बाळासाहेब ठाकरे कर्जमुक्ती अभियान राबविण्यात आले होते. त्याच धर्तीवर राज्यात “अजितदादा शेतकरी कर्जमुक्ती योजना” सुरू करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
















