नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळून आल्याने त्यांचा पंजाब दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी संतापले असून त्यांनी आपला दौरा रद्द करून ते दिल्लीकडे रवाना झाले आहेत. ‘मी भटिंडा विमानतळापर्यंत जिवंत पोहोचू शकलो याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा.’ अशा शब्दांत भटिंडा विमानतळावरील अधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनावले.
पंतप्रधान मोदी हे आज पंजाब दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचा ताफा द्या मार्गावरुन जाणार असतो तो मार्ग पूर्ण रिकामा करण्यात येतो. मात्र, पंतप्रधान मोदींच्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक आंदोलन करत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे मोदींना काही वेळ आपल्या गाडीतच थांबून राहावं लागलं. त्यानंतर मोदींनी आपल्या पंजाब दौरा रद्द करत ते पुन्हा भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथे त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ‘आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमातळावर जिवंत पोहोचू शकलो’, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी संताप व्यक्त केल्याचं समजतं.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने या घटनेला पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेतील गंभीर चूक असं म्हटलं आहे. गृह मंत्रालयाकडून जारी केलेल्या निवदेनात म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब यात्रेदरम्यान सुरक्षा व्यवस्थेत गंभूर चूक झाल्यानं त्यांचा ताफा माघारी फिरला. पंजाब सरकारला या चुकीबाबत जबाबदारी निश्चित करणे आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचंही सांगण्यात येत आहे.