नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. अशातच कोरोनाविषयी धोरणावर कॉंग्रेस पक्ष सातत्याने केंद्र सरकारवर निशाणा साधत आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनामुळे रोज हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतोय. तरीही पंतप्रधानांना नव्या संसदेचं म्हणजे सेंट्रल विस्टाच्या बांधकामाशिवाय काहीच सुचत नाही अशी टीका त्यांनी केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, “देशभरातील नद्यांमधून हजारो प्रेतं तरंगताहेत, रुग्णालयासमोर भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. लोकांच्या जीवनातील सुरक्षेचा हक्क नाकारला जात आहे. पंतप्रधानांनी आपल्या डोळ्यावरील गुलाबी रंगाचा चश्मा उतरवावा, त्यांना सेंट्रल विस्टाच्या बांधकामाशिवाय काहीच दिसत नाही.”
कोरोना काळात उत्तर प्रदेश, बिहार आणि हरयाणामधील नद्यांमध्ये रुग्णांची प्रेतं तरंगताना दिसत आहेत. असं सांगण्यात येतंय की स्मशानात मृत्यू झालेल्या रुग्णांना दहन करण्यासाठी जागा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे ही प्रेतं नद्यांमध्ये सोडण्यात येत आहेत. या घटनेवरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय.
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या मोहिमेवरही टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, देशातल्या अर्ध्या लोकसंख्येकडे इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे त्यांना ऑफलाइन बुकिंगचीही सुविधा मिळावी.