चाळीसगाव (प्रतिनिधी) दि.२७ एप्रिल रोजी रात्री पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी वारकरी संप्रदायात पवित्र मानल्या गेलेल्या नारदाच्या गादीचा अनावधानाने केलेल्या अपमानबद्दल पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी मागितली वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागितली आहे. तर दुसरीकडे अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल के.के.पाटील यांना मोठ्या मनाने माफ करावे, असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.
चाळीसगाव शहरातील हनुमानसिंग राजपूत नगर परिसरातील संतोषी माता मंदिराजवळ कीर्तन सप्ताह कार्यक्रम १० वाजेनंतर सुरु असल्याचे लक्षात येताच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी त्याठिकाणी जाऊन सदर माईक बंद केला होता. तसेच वारकरी संप्रदायात पवित्र मानल्या गेलेल्या नारदाच्या गादीवर बुटासहित पाय ठेवले गेल्याची घटना घडली होती. सदर फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. त्यानंतर राज्यभरातील वारकारी संप्रदाय व हिंदू जनमानसात तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. काल मध्यरात्री याबाबत चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनादेखील ही बातमी कळली होती. यानंतर आमदार चव्हाण यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक के के पाटील यांना सदर विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले व याचे उद्या राज्यभरात पडसाद उमटून कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल याची कल्पना दिली. त्यावेळी पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी देखील सदर घटना अनवधानाने झाली असून मला पवित्र अश्या नारदाच्या गादीचे महत्व माहिती नव्हते असे सांगितले. कर्तव्य बजावत असताना हि चूक झाली असल्याने मी सर्व वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागण्यास तयार असल्याचे सांगितले.
याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, मान्यवर व पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांची बैठक आपल्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात घडवून आणली. त्यावेळी पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी विठ्ठलाच्या प्रतिमेला साक्षी ठेवून अनवधानाने घडलेल्या या चुकीबद्दल जाहीर माफी मागत असल्याचे सांगितले.
आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, मी स्वतः वारकरी पुत्र असल्याने माझ्याही भावना दुखावणे साहजिकच होते. मात्र तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांचे काम, त्यांनी शहरातील अवैध धंधे, मुलींची छेड गाडणारे गावगुंड यांचा केलेला बंदोबस्त व आजवरची त्यांची कामगिरी माझ्यासह चाळीसगाव शहराने अनुभवली असल्याने या सर्व विषयावर पडदा पडावा. तसेच सर्व समाजाला सदर घटनेतील पोलीस प्रशासनाची बाजू कळावी या उद्देशाने चाळीसगाव शहरातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार व मान्यवर मंडळी सोबत त्यांची बैठक चाळीसगाव येथील कार्यालयात घडवून आणली असल्याचे सांगितले. पुन्हा अश्या घटना घडणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देखील पोलीस प्रशासनाला केल्या.
गेली दोन वर्ष कोविड मुळे कीर्तन बंद होते, चाळीसगाव तालुक्यात आता कुठे काही प्रमाणात कीर्तन सप्ताह सुरु झाले असून त्यासाठी पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांची वेळोवेळी मदत झाली असल्याचे उपस्थित कीर्तनकार व मान्यवर यांनीदेखील मान्य केले. के.के.पाटील यांच्याकडून ही चूक अनवधानाने झालेली असल्याचे त्यांनी मान्य केल्याने व वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागितली आहे. वारकरी संप्रदाय हा सहनशील असून आपण आजवर अनेकांच्या चुका पोटात घेतल्या आहेत. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडून ही चूक झाल्याने तसेच चाळीसगाव शहरातील त्यांचे आजवरचे चांगले काम पाहता हा विषय आम्ही इथेच थांबवीत असल्याचे जाहीर केले. तसेच आता यापुढे सोशल मिडीयावर कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ नये असेदेखील आवाहन केले.
यावेळी ह.भ.प. राम महाराज, ह.भ.प. सुधाकर तात्या, ह.भ.प. ए.बी.पाटील, ह.भ.प. ओझर लीलाधर महाराज, ह.भ.प. राम महाराज, पातोंडा येथील ह.भ.प.अल्केश महाराज, ह.भ.प. विनय महाराज हिरापूर, ह.भ.प. मयूर महाराज, ह.भ.प. रोहिदास महाराज, ह.भ.प. उदय महाराज, ह.भ.प. विनीत महाराज, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, भाजपा अध्यात्मिक आघाडी जिल्हा समन्वयक भूषण पाटील, भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश महाराज आदी उपस्थित होते.