वाशिम (वृत्तसंस्था) पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पूजा चव्हाण प्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण करण्यात आलं. परंतु सोशल मीडियातून आणि इतर मार्गाने माझी आणि बंजारा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चौकशीतून सत्य समोर येईल, असं संजय राठोड यांनी सांगितलं.
सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात नाव आल्यामुळं वादात सापडलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आज दोन आठवड्यानंतर सार्वजनिकरित्या पुढे आले आहेत. संजय राठोड यांनी आज पूजा चव्हाणच्या आत्महत्येवर पहिल्यादांच प्रतिक्रिया दिली आहे. आज राठोड यांनी पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे. ‘पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल संपूर्ण गोर बंजारा समाज दुःखी आहे. चव्हाण कुटुंबियांच्या दुखाःत मी सहभागी आहे. मात्र, या प्रकरणात घाणेरडे राजकारण केलं जातं आहे. हा प्रकार माझी सामाजिक, राजकीय, आणि वैयक्तिक कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरु केली आहे तपासात सर्व गोष्टी स्पष्ट होतील,’ असं स्पष्टीकरण संजय राठोड यांनी केलं आहे.
पूजा चव्हाण ही बंजारा समाजाची मुलगी होती. तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण बंजारा समाजाला दु:ख झाले आहे. आम्ही सगळे चव्हाण कुटुंबाच्या दुखात सहभागी आहोत. या प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यंत घाणरेडे राजकारण करण्यात आले आहे. मी गेल्या ३० वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय आयुष्यात आहे, माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा वाईट प्रकार पाहण्यास मिळाला आहे. प्रसारमाध्यमातून जे काही दाखवण्यात आले होते. त्यामध्ये काहीही तथ्य नाही’, असा खुलासा राठोड यांनी केला. ‘मी १५ दिवस गायब नव्हतो मुंबईतील फ्लॅटवरुन शासकीय काम करत होतो. आजपासून पुन्हा पूर्वीप्रमाणं काम करणार आहे. चौकशीमधून सर्व सत्य बाहेर येईल, आपण विश्वास ठेवावा,’ असं ते म्हणाले आहेत.
मी कुठेही गायब नव्हतो. आज पोहरादेवीच्या पवित्र भूमीत दर्शन घेऊन मी माझं काम सुरु करणार आहे, असंही राठोड यांनी सांगितलं. माझ्यावर अनेक लोकांचं प्रेम आहे. सर्वांना सोबत घेऊन मी आतापर्यंत काम केलं आहे. एका घटनेमुळे तुम्ही मला चुकीचं ठरवू नका. चौकशीतून खरं काय आहे ते समोर येईल, असं संजय राठोड यांनी सांगितलं.