रावेर (प्रतिनिधी) चित्रपटात आपण अनेक वेळा पाहिलं आहे की, आधी लग्न झालेलं असतानाही नवरा दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात असतो आणि तेवढ्यात पहिल्या बायकोची लग्न मंडपात एन्ट्री होते आणि मग सुरु होतो एकच गोंधळ, असाच काहीसा किस्सा १२ मे रोजी रावेर येथे घडला आहे. यात सर्वात धक्कादायक म्हणजे नवरदेव मुलाने अवघ्या महिन्याभरापूर्वीच गुपचूप आळंदी येथे आपल्या प्रेयसीसोबत ‘लव्ह मॅरेज’ केले होते.
नवरदेवाच्या पहिली बायकोची मंडपात एन्ट्री अन् उडाला एकच गोंधळ !
या संदर्भात माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार शहरातील बऱ्हाणपूर रोडवरील एका मंगल कार्यालयात एक तरुणींनी लग्न मंडपात गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस लग्न मंडपात पोहोचल्यावर एक तरुणी गोंधळ घालत असल्याचे दिसून आले. तिची विचारपूस केली असता गोंधळ घालणारी तरुणी नवरदेवाची पहिली पत्नी असल्याचे समोर आले आणि सर्वांना जबर धक्काच बसला. पातोंडा (जि. बऱ्हाणपूर) येथील एका उच्च शिक्षित तरुणाचे पातोंडा (जि. बऱ्हाणपूर) येथील तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या मुलीशी १२ मे रोजी लग्न निश्चित झाले होते.
वरात लग्न मंडपातून थेट पोलिस ठाण्यात !
रावेर येथील बऱ्हाणपूर रस्त्यावरील मंगल कार्यालयात हे लग्न नियोजित होते. पण, गोष्ट पुणे येथील पहिल्या पत्नीला कळाली. दुसरीकडे विवाह मंडपातील बोहल्यावर चढून वधू-वरांच्या डोक्यावर अवघ्या काही मिनिटात अक्षता पडणार होत्या. पण, तेवढ्यात नवऱ्या मुलाची पहिल्या पत्नीने लग्न मंडप गाठले. नवरदेव असलेला तरुण व आपले महिनाभरापूर्वी आळंदी येथे लग्न झाल्याचा दावा तिने केला. यामुळे लग्न मंडपात गोंधळ उडाला. मंडपात आलेल्या पोलिसांनी लग्न रोखून चौकशीसाठी नवरदेवाची वरात लग्न मंडपातून थेट पोलिस ठाण्यात आणली. तेथे संबंधित तरुणीने आपल्याशी विवाह केल्याचे सर्व पुरावे सादर केले. त्यामुळे नवऱ्या मुलाचे पितळ उघडे पडले.
महिनाभरापूर्वी एप्रिलमध्ये आळंदी येथे केला पहिला विवाह !
पोलीस चौकशीत बऱ्हाणपूर येथील रहिवासी असलेल्या मुलीसोबत गेल्या महिन्यात आळंदी येथे पहिले लग्न केल्याची कबुली नवरोबाने चौकशीत दिली. या चौकशीत त्याने आपले दुसऱ्या समाजातील मुलीशी प्रेमसंबंध होते. आम्ही महिनाभरापूर्वी एप्रिलमध्ये आळंदी येथे विवाह केला होता. पण ही माहिती आपण कुटुंबीयांना दिली नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याच्यासाठी रावेर तालुक्यातील एका गावातील स्थळ निश्चित करून १२ मे रोजी विवाह निश्चित केला असल्याचे सांगीतले. दरम्यान, सर्व गोष्टी उघड झाल्यानंतर पोलिसांनी विवाह रोखण्यास सांगितले. यानंतर समाजातील वरिष्ठ लोकांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. त्यामुळे नवविवाहितेने व नियोजित वधूच्या नातेवाइकांनी पोलिसांत तक्रार दिली नाही. परंतू नियोजित वधूच्या आईवडिलांनी आजवर केलेला खर्च नवरदेवाने अदा करावा, असा निर्णय समाजपंचांनी घेत प्रकरण मिटवल्याचे कळते.
सोशल मिडीयामुळे झाला भांडाफोड !
नवरदेव मुलाचे साखरपुडा झाल्यानंतरचे फोटो नातेवाईक व मित्रमंडळींनी सोशल मीडियावर टाकले. फोटो बघताच पहिल्या पत्नीला मोठा धक्काच बसला. तिने नियोजित वधूशी संपर्क साधत संपूर्ण माहिती देत हा विवाह थांबविण्याची विनंती केली. मात्र, नियोजित वधूचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही. म्हणून तिने होणाऱ्या पतीस ही बाब सांगितली. यावर त्याने ती माझी चुलत बहीण असून तुझा आत्मविश्वास तपासण्यासाठी मजा घेत असल्याचे त्याने सांगितले. नियोजित वधूला आपल्या सांगण्यावर विश्वास बसत नाही व विवाह रद्द होऊ शकत नाही याची खात्री पटल्यानंतर नवविवाहितेने थेट पुण्याहून रावेर गाठले होते.