नवी दिल्ली । शेतकरीविरोधी वटहुकूम आणि विधेयकांच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा म्हणजे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा मंत्रिमंडळातून राजीनामा स्वीकारला आहे.
पंतप्रधान रामनाथ कोविंद यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारला. तसेच त्यांच्या खात्याचा कार्यभार मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे देण्यात आला आहे. तोमर यांच्याकडे हरसिमरत कौर यांच्या अन्नप्रक्रिया उद्योगमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार असेल. कृषीविषयक विधेयके पंजाबमधील कृषी क्षेत्र नष्ट करतील, असा दावा करत सुखबीर यांनी केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत या राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले.
हरसिमरत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार पानी राजीनामापत्र पाठवून सरकारला लक्ष्य केले. शिरोमणी अकाली दलाने वारंवार विनंती करूनही केंद्र सरकारने या विधेयकांबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. शेतकऱ्यांच्या हितरक्षणाची आमच्या पक्षाची परंपरा असून, पक्षाचा प्रत्येक सदस्य शेतकरी आहे, असे हरसिमरत यांनी या पत्रात म्हटले आहे.