नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान जीव गमावणाऱ्या नवरीत सिंग यांच्या मृत्यूवर राजकारण तापलय. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी नवरीत सिंग यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रामपूर येथे जात आहेत. प्रियांका गांधींशिवाय आज राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरीदेखील त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जाणार आहे. आज नवरीत सिंग यांचा दहाव्याचा कार्यक्रम आहे. प्रियांका गांधी या कार्यक्रमात भाग घेणार आहेत.
ट्रॅकटर रॅलीनंतर पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये आयटीओजवळ पोलिस बॅरीकेड तोडण्याच्या प्रयत्नात असणारा एक भरधाव वेगाने येणारा ट्रॅक्टर पलटी झाला. या ट्रॅक्टरखाली दबून नवरीत सिंग यांचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन अहवालात देखील सिंग यांच्या मृत्यूचे कारण अपघात आहे. प्रियंका गांधी दिल्लीतून निघाल्या आहे. त्यांच्यासह उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष लल्लू सिंग देखील आहे. NH-२४ मार्गाने त्या उत्तर प्रदेशातील रामपूर येथे जाणार आहे. त्यांच्यासह गाड्यांचा मोठा ताफा देखील आहे.
ट्रॅक्टर रॅली दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी अनेक अटींचं यावेळी उल्लघन केल्याचं सांगण्यात येतंय. शस्त्रे न बाळगता, निर्धारित मार्गाचा अवलंब करून आणि ट्रॉलीविना ट्रॅक्टरसह दिल्लीत प्रवेश करणे अशा काही अटींवर शेतकरी नेते आणि पोलीस यांच्यात सहमती झाली होती. मात्र ट्रॅक्टरच्या परेडमध्ये सहभागी असलेल्या अनेक निदर्शकांनी नियमांचं उल्लंघन केलं. पाच पेक्षा जास्त लोक ट्रॅक्टरवर बसणार नाहीत, या अटीचंही उल्लंघन आंदोलक शेतकऱ्यांनी केलं. त्यामुळे हा ट्रॅक्टर मार्च हिंसक झाला आणि यावेळी अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली.
शेतकरी मागे हटणार नाहीत
“सरकार शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण का करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की ऑफर टेबलवर आहे. हा कायदा दोन वर्षांसाठी थांबवला जाऊ शकतो. या समस्येचे निराकरण केले गेले पाहिजे. मी शेतकऱ्यांना चांगले ओळखतो. ते मागे हटणार नाहीत, सरकारलाचा मागे हटावे लागेल,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.