लखनौ (वृत्तसंस्था) प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत निघालेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या अंत्य संस्काराला जात असताना काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या ताफ्याला अपघात झाला. हा अपघात हापूड येथे झाला. प्रियांका गांधींच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांना धडकल्या. सुदैवाने या अपघात प्रियांका गांधी यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
प्रियांका गांधी आपल्या ताफ्यासह आज सकाळी उत्तर प्रदेशातील रामपूरकडे रवाना झाल्या. प्रियांका यांच्या कारच्या वायपरमधील पाणी संपले होते, त्यातच कारची काच धुरकट झाली होती. त्यामुळे समोर काही दिसत नसल्यामुळे चालकाने अचानक ब्रेक मारले. त्यामुळे पाठीमागून येत असलेल्या कार एकमेकांवर जाऊन आदळल्यात. पाठीमागून येणाऱ्या गाड्यांना काहीच कळाले नाही, त्यामुळे एकापाठोपाठ गाड्या एकमेकांवर आदळल्यात. या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, गाड्यांचे बरेच नुकसान झाले आहे. नवी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीदरम्यान रामपूरमधील नवरीत सिंग या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. नवरीत सिंग हा वेगाने ट्रॅक्टर चालवत असताना त्याचा अपघात झाला होता. या अपघातात नवरीत सिंग मृत्युमुखी पडला होता. नवरीत सिंगच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी प्रियंका गांधी या त्यांच्या निवासस्थानी जात आहे.
कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी नवरीत सिंग यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी रामपूरला जात आहेत. तसेच आज राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी देखील सिंग यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणार आहेत. आज नवरीत सिंग यांचा दहाव्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात प्रियांका गांधी सहभागी होणार आहेत. ट्रॅक्टर रॅलीनंतर पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये आयटीओजवळ पोलिस बॅरीकेड तोडण्याच्या प्रयत्नात असणारा एक भरधाव वेगाने येणारा ट्रॅक्टर पलटी झाला. या ट्रॅक्टरखाली दबून नवरीत सिंग यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात देखील सिंग यांच्या मृत्यूचे कारण अपघात सांगितलं आहे.