कोल्हापूर (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सेनेचे राज्यसभा उमेदवार संजय पवार देखील उपस्थित होते. मी त्यांचं निवेदन ऐकलं, कोल्हापूरच्या मातीमध्ये सत्य आणि प्रामाणिकपणा टिकून आहे. शाहू घराण्यानं सत्याची कास सोडली नाही, हे देखील सिद्ध झालं, असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेनं कधीही कोणाची फसवणूक केली नाही हे स्वतः शाहू छत्रपती यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी जी विधाने केली. ठरवून कोंडी केली ते विधान किती खोटे होते. ते आज शाहू छत्रपती यांनी स्पष्ट केले याबद्दल त्यांचे आभार असे राऊत म्हणाले. शाहू महाराज यांचा अनुभव अधिक दांडगा आहे. छत्रपती शाहू महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचा निकटचा संबंध होता. काही लोकांनी पेटवापेटवीची भाषा केली. पण, शिवसेनेने कधीही राज्यसभेच्या उमेदवारीच्या त्या प्रकरणात खालच्या पातळीवरचे राजकारण केले नाही.
राज्यसभेची सहावी जागा आमची होती आणि तसा प्रस्ताव आम्ही संभाजीराजे यांच्यापुढे ठेवला होता. परंतु, त्यांना पुढे करून फडणवीस यांनी एक वेगळा डाव खेळण्याचा प्रयत्न केला. पण हा डाव नव्हता तर ते कपट होते. फडणवीस यांचे हे कपट शाहू महाराज यांनी पुढे आणले. सचोट आणि प्रामाणिकपणा यामुळेच महाराष्ट्र शाहू घराण्यापुढे झुकतो. सत्याची कास, सचोटी आणि प्रामाणिकपणा तसेच ज्यावेळी महाराष्ट्रावर संकट येते तेव्हा शाहू घराणे पुढे येते याचा पुन्हा प्रत्यय आला असे राऊत म्हणाले.