जळगाव (प्रतिनिधी) ‘मविप्र’ संस्थेच्या वादातून ॲड. विजय भास्कर पाटील यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी पुण्यातील कोथरूड पोलिसांचे पथक शहरात दाखल झाले आहे.
या पथकातील अधिकाऱ्यांनी सहायक पोलीस आयुक्तांच्या नावे पत्रव्यवहारची संपूर्ण माहिती मागविली आहे. या पथकातील अधिकाऱ्यांनी सहायक पोलीस आयुक्तांच्या नावे पत्रव्यवहार करून सन २०१२ पासून तर आजपर्यंतची संपूर्ण माहिती २५ जानेवारीपर्यंत मागविली आहे. दरम्यान, पोलीस ठाण्यांमध्येही दाखल गुन्ह्यांची माहिती पथकाकडून संकलित केली जात आहे. अॅड.विजय पाटील यांनी गेल्या महिन्यात माजी मंत्री गिरीश महाजन, मविप्र संस्थेचे मानद सचिव नीलेश भोईटे, तानाजी भोईटे, विरेंद्र भोईटे यांच्यासह २९ जणांविरुध्द निभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार हा गुन्हा पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात वर्ग झाला आहे. याच गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांचे दोन अधिकारी, कर्मचारी अशा चार जणांचे एक पथक गुरुवारी दाखल झाले. पथकाने गुन्ह्याकामी आवश्यक माहिती मिळावी म्हणून मविप्रसंदर्भात जिल्हाभरात एकत्रित दाखल गुन्हे, त्याचा तपास याबाबत पोलीस अधीक्षकांना पत्र दिले. दाखल गुन्हे व शैक्षणिक माहितीसाठी साहाय्यक शिक्षण सहसंचालक सतीश देशपांडे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांनाही पत्रव्यवहार केला आहे.
संस्थेचे आर्थिक व्यवहार संचालक मंडळाशिवाय दुसऱ्या गटाच्या नावे करावे म्हणून कोणाचे पत्र होते, याची माहिती घेण्यासाठी मविप्रचे खाते असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलाही पत्र दिले आहे. सहकार विभागाने निवडणुका घेतल्या होत्या. सहकार कायद्यानुसार निवडणूक केव्हा, कोणत्या कालावधीसाठी घेण्यात आली होती, याबाबत जिल्हा उपनिबंधकांनाही पत्र दिले आहे. मविप्र सरकार विभागाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करून तेथे निवडणुका घेतल्या होत्या निवडून आलेल्या संचालकांना पदभार दिला होता. असे असताना संचालक मंडळाकडून पदभार काढून सत्ता भोईटे गटाकडे देण्यात आली होती. यात शिक्षण विभागाने दिलेल्या पत्राची भूमिका महत्त्वाची होती.