मुंबई (वृत्तसंस्था) विधीमंडळाच्या लॉबीत मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात धक्काबुक्की होत चांगलाच राडा झाल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री शिंदे सभागृहात आल्यानंतर विकासकामांबाबत चर्चा करताना शिंदे गटाचे आमदार दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर दोघांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे बोलले जात आहे. यावेळी शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांनी मध्यस्थी केली. कोणत्या कारणावरून हा वाद झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. तर मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधत या घटनेची सविस्तर माहिती देत महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यात कोणताही वाद झालेला नाही. विकासकामांवरून चर्चा करताना आवाज वाढला. त्याला वाद म्हणता येणार नाही, असंही शंभुराज देसाईंनी स्पष्ट केलं.
तर दुसरीकडे कोण भिडले, कोण नाही भिडले, हे मला माहित नाही, पण हे गंभीर आहे. महान नेत्यांची परंपरा या महाराष्ट्राने पाहिली, पण असा प्रकार कधी झाला नाही. विधानसभेचे नाव लौकिक होते पण, त्याला आज काळिमा फासली गेल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.