नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हाथरसच्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवतीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वढेरा यांना महामार्गावरच अटक करण्यात आली. त्यापूर्वी राहुल गांधी यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली होती. या घटनेचा सर्वच पक्षांकडून निषेध करण्यात आला. त्यानंतर आता राहुल गांधी पुन्हा एकदा हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याच्या तयारीत आहेत.
राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हणाले कि, जगातील कोणतीही ताकद मला हाथरस येथील दु:खी कुटुंबाला भेटण्यापासून रोखू शकत नाही. पीडित मुलीबरोबर आणि कुटुंबासोबत उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांनी केलेला व्यवहार मला तर मान्य नाहीच शिवाय कोणत्याही भारतीयांना हा व्यवहार पटला नसेल, असेही त्यांनी म्हंटले आहे. तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी शुक्रवारी उत्तरप्रदेशातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. उत्तरप्रदेश प्रशासन सत्य लपवण्यासाठी पाशवीपणा करत आहे, असा आरोप त्यांनी केला. राहुल यांनी ट्विटरवरून उत्तरप्रदेश सरकारवर निशाणा साधला. आमच्याबरोबरच मीडियालाही पीडितेच्या कुटूंबीयांना भेटू देण्यात आले नाही. पीडितेच्या कुटूंबीयांना घराबाहेरही पडू दिले जात नाही. त्यांना मारहाणही करण्यात आल्याचे समजते. कुठलाच भारतीय अशा वर्तणुकीचे समर्थन करणार नाही, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, तृणमूल कॉंग्रेसच्या शिष्टमंडळास पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्थेत रोखण्यात आले होते.
दरम्यान, हाथरस येथील पीडितेचा खटला चालवण्यास दिल्लीतील निर्भया प्रकरणातील वकील सीमा खुशवाह यांनी मान्यात दिली. त्या गुरुवारी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेल्या. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना भेटण्यास रोखले.