पुणे (वृत्तसंस्था) दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून २२ डिसेंबरला मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. पुण्यात आयोजि पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढावदेखील यावेळी उपस्थित होते. त्यांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे.
मोदी सरकारचे कृषी कायदे हे अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींच्या भल्यासाठी आहेत. मुकेश अंबानी यांची भूक वाढली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांवर नको असलेली विधेयके लादली जात असल्याचा आरोप खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. “आंदोलनाची दखल केंद्र सरकार घेत नाही. तसंच ज्या अंबानी आणि अदानी यांच्यासाठी कृषी विधेयक आणले आहे, त्यांच्या निषेधार्थ २२ डिसेंबरला मुंबईतील उपजिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीमधील अंबानी इस्टेटवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मोर्चा काढला जाणार,” असं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे. यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, “दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटत असून जवळपास तीस शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर २० डिसेंबर रोजी संध्याकाळी प्रत्येक गावामध्ये मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यावेळी आंदोलन यशस्वी करण्याची शपथ घेतली जाणार आहे”. शेतकऱ्यांनी ज्या कायद्यांची मागणीच केली नाही ते कायदे शेतकऱ्यांवर लादण्यात आले. सरकारला शेतकऱ्यांना काही द्यायचंच असेल तर हमीभाव द्या. दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. यावरून शेतकऱ्यांच्या मागण्या सर्वोच्च न्यायालयाला मान्य असल्याचे दिसत आहे. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात महाराष्ट्रातील शेतकरी संघटना एकत्र असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला.