उस्मानाबाद (वृत्तसंस्था) राज्यातील आणखी एका बँकेचं लायसन्स आरबीआयनं रद्द केलंय. उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचं लायसन्स रद्द करण्यात येत असल्याची घोषणा आरबीआयनं केली आहे. या बँकेचे लायसन सोमवारी व्यवहार संपल्यानंतर रद्द होणार आहे. यानंतर ही बँक कोणतेही व्यवहार करू शकणार नाही, असे आरबीआयने सांगितले.
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील सहकारी बँकांवर भारतीय रिझर्व्ह बँकेनं टाच आणली आहे. त्यानंतर आता उस्मानाबादेतील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. आजपासून या बँकेला व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे. आरबीआयने वसंतदादा सहकारी बँकेवर कारवाईबाबत एक पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात अनेक आरोप ठेवले आहे. बँक ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात असमर्थ असल्याचा दावा करण्यात आला आहे. आता बँकेचा परवाना रद्द झाल्यामुळे लिक्विडेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे. ठेवीदारांचे पैसे आता परत देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आरबीआयच्या कारवाईमुळे ठेवीदारांची ५ लाखांपर्यंतची रक्कम ही सुरक्षित आहे. त्यामुळे बँकेतून ५ लाखांपर्यंतच पैसे मिळणार आहे. वसंतदादा नागरी सहकारी बँकेतील ९९ टक्के खातेदारांचे पैसे हे परत देण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेनं महाराष्ट्राच्या कमिशनर फॉर कॉर्पोरेशन आणि रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीला आदेश दिले आहे. त्यानुसार, आता वसंतदादा नागरी बँकेचे कामकाज बंद केले जाणार आहे. बँक लवकर दिवाळखोरीत काढली जाणार आहे. याआधी आरबीआयने मुंबईतील सीकेपी को-ऑपरेटिव्ह बँक, कोल्हापूरमधील सुभद्रा लोकल एरिया बँक, जालन्यातील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, साताऱ्यातील कराड जनता बँकेचे परवाने रद्द केले होते. त्यानंतर आता उस्मानाबादेतील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे.
दुसरीकडे आरबीआयने चिंता व्यक्त करताना म्हटले की, कोरोन संकटामुळे बँकांची स्थिती ढासळण्याची शक्यता आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे बँकांच्या संपत्तीवर संक्रांत येऊ शकते. तसेच बँकांकडील निधीतही कमी येऊ शकते. याचसोबत सरकारकडेही महसूल कमी झाला आहे. आरबीआयने या आधी म्हापसा बँक, सीकेपी को ऑपरेटीव्ह बँक, कराड जनता सहकारी बँकेचे लायसन गेल्या वर्षी रद्द केले होते. याचबरोबर आरबीआयने १०० हून अधिक सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
















