नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहे. याच दरम्यान पंजाबजचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत केंद्राला गंभीर इशारा देण्यात आला आहे. अमरिंदर सिंग यांनी १९८४ च्या ऑपरेशन ब्लू स्टारचं उदाहरण देत लवकर तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे.
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरू आहे. भारताबरोबरच परदेशातही याचे पडसाद उमटताना दिसत आहे. केंद्र सरकारकडून मागण्यांची दखल घेतली जात नसल्यानं आंदोलन आणखी तीव्र होऊ लागलं आहे. कायदे रद्द केल्याशिवाय घरी जाणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला असून, पंजाबजचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी यावरून केंद्राला गंभीर इशारा दिला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत शेतकरी आंदोलनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. शेतकरी आंदोलकांच्या मागण्यावर तोडगा काढण्यास होणारा विलंब १९८४ ऑपरेशन ब्लू स्टारच्या दिशेनं राज्याला ढकलून शकतो, असं ते बैठकीत म्हणाले. शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत तातडीने तोडगा काढण्याची गरज असल्याच्या विधानावर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी बैठकीत जोर दिला. बैठकीत मुख्यमंत्री काय म्हणाले याबद्दलची माहिती पत्रकातून देण्यात आली. “मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला आणि सांगितलं की, पाकिस्तानाकडून असलेल्या धोक्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सर्व गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी आपल्याला हा मुद्दा सोडवण्यासाठी काम करावं लागणार आहे. सीमेपलीकडून (पाकिस्तानातून) किती ड्रोन्स, शस्त्रास्त्र आणि स्फोटक तस्करीच्या मार्गानं पंजाबमध्ये आणण्यात आले आहेत, याची आपल्याला माहिती असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितलं.”
“४२ मागण्यांवरून दोन महिने चर्चा चालल्यानंतर पंजाबमध्ये अशांतता निर्माण झाली”
ऑपरेशन ब्लू स्टार होण्याआधी दोन चाललेल्या चर्चेची आठवणही मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काढली. ४२ मागण्यांवरून दोन महिने चर्चा चालल्यानंतर पंजाबमध्ये अशांतता निर्माण झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला होता की असंतोष धुसमत आहे, याचा स्फोट होईल, अशी त्यावेळच्या घडामोडींची आठवणही अमरिंदर सिंह यांनी बैठकीत सांगितल्याचं जनसंपर्क विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याचे नियोजन केले होते. मात्र या रॅलीला हिंसक वळण लागले. पोलिसांनी आखून दिलेले मार्ग धुडकावत आंदोलक दिल्लीत घुसले. आंदोलक शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत प्रवेश करत लाल किल्ल्यावर कब्जा केला. तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला झेंडा फडकवला आहे. याच दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर परतण्याचं आवाहन केलं होतं. अमरिंदर सिंग यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं होतं. “दिल्लीत जे घडलं ते धक्कादायक दृश्य होतं. ट्रॅक्टर रॅली दरम्यान समाजकंटकांनी केलेली हिंसा कधीही स्वीकारली जाणार नाही. शांततेच्या मार्गानं सुरू असलेल्या आंदोलनाला आजच्या घटनेने छेद गेला आहे. शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांनी हिंसक घटनेपासून दूर ठेवलं आहे. ट्रॅक्टर रॅली स्थगित करण्यात आली आहे. सर्व खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीमधून परत सीमांवर यावं” अमरिंदर सिंग यांनी म्हटलं होत.