मुंबई (वृत्तसंस्था) अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांडातील मुख्य संशयित सचिन वाझे यांच्या पोलीस कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सचिन वाझे यांची कोठडी आज संपल्याने त्यांना एनआयएच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
मनसुख हिरण मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या एपीआय सचिन वाझेंना ७ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. आज पोलिस कोठडी संपल्यानंतर आज सचिन वाझे एनआयए कोर्टापुढे हजर झाले. सचिन वाझेंना हदय रोगाचा आजार असल्याचं त्यांच्यावतीनं सांगण्यात आलं. रविवारी स्ट्रोक आल्याची कोर्टाला त्यांनी स्वत:हून माहिती दिली. यावर वाझेंना योग्य ते उपचार मिळत आहेत, असा दावा एनआयएनं केला. ताब्यात घेतल्यापासून दोनदा 2D eco, ब्लड टेस्ट करण्यात आल्याची माहिती कोर्टाला NIAनं दिली. त्यावर केवळ 2D eco पुरेसं नाही, अँजिओग्राफीची गरज असल्याचा दावा वाझेंच्या वकिलांनी केला. तर एनआयएचे वकील अनिल सिंग यांनी हा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असून आणखी काही गोष्टींच्या चौकशीसाठी सचिन वाझे यांची कोठडी महत्त्वाची असल्याचे सांगितले.
आतापर्यंत एनआयए सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे सचिन वाझे यांना कोंडीत पकडू पाहत होती. मात्र, आता वाझे यांनीदेखील सीसीटीव्ही फुटेज सर्व गोष्टी स्पष्ट करेल, असा उलट दावा केला आहे. सीसीटीव्ही फुटेजचा तब्बल १२० टीबी डेटा एनआयएकडे आहे. या फुटेजमध्ये कोणीही छेडछाड करु शकत नाही, असं वाझेंनी कोर्टाला सांगितलं.
कसलीच कबुली दिली नाही
वाझेंनी बरेच आरोप कबुल केल्याचं एनआयएने गेल्या सुनावणीवेळी सांगितलं होतं. मात्र, आज वाझेंनी आपण कोणतीच कबुली दिली नसल्याचं सांगत एनआयएला कोर्टात तोंडघशी पाडलं आहे. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. मी कोणतीही कबुली दिलेली नाही. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनचा आरोपही माझ्यावरच लावण्यात आला, असंही वाझेंनी कोर्टाला सांगितलं.
आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास
दरम्यान, आज सचिन वाझे यांची सुनावणी होती. यावेळी त्यांचे बंधू सुधर्मही उपस्थित होते. यावेळी वाझे आणि त्यांच्या भावाची काही मिनिटांसाठी भेट झाली. त्यानंतर सुधर्म यांनी आमचा एनआयए आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असं सांगितलं.
















