जळगाव (प्रतिनिधी) गर्भपाताकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन परिवर्तीत होऊन सुरक्षित गर्भपात हा प्रत्येक महिलेचा हक्क आहे. हे समाजाच्या निदर्शनास येणे अत्यंत गरजेचे आहे. असे मार्गदर्शन आनंद पवार संचालक “सम्यक” संवाद आणि संसाधन केंद्र पुणे यांनी केले.
“सम्यक”पुणे द्वारा आयोजित यंशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे ४ जानेवारी ते ६ जानेवारी दरम्यान आयोजित सक्षम ग्रामीण पत्रकार प्रशिक्षण कार्यक्रमात पितृसत्ता, लिंगनिवड व प्रजनन या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पितृसत्ता किंवा मातृसत्ता या दोन्हीही बाबींच्या मागे न लागता, संपूर्ण समाजात बरोबरीचे वातावरण निर्माण होऊन, केवळ पुनरूत्पादन करणारी वस्तू म्हणून स्त्रीकडे न बघता, व्यक्ती म्हणून तिला जगण्याचा अधिकार मिळाल्यावरच, प्रजननाचा हक्क तिला प्राप्त होऊ शकेल. स्त्रीचे शारीरिक व मानसिक आरोग्य सदृढ राहाण्याकरिता असुरक्षित गर्भपात टाळणे हे माणुसकीचे लक्षण आहे. भारतात दरवर्षी सरासरी सत्तर लाख गर्भपात होतात. त्यपैकी अंदाजे ५०% गर्भपात असुरक्षितरित्या झाल्याने जवळ जवळ ८% महिला मृत्यूमुखी पडतात. व प्रसंगी आयुष्यभराच्या गंभीर दुखण्यास त्या बळी पडतात असेही त्यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात प्रितम पोतदार यांनी पी. सी. पी. एन. डी. टी. कायद्याचे सविस्तर मार्गदर्शन पत्रकारांना केले. विविध खेळ, प्रयोग, चाचणी व व्यक्तीगतरित्या विचारांची मांडणी या माध्यमांद्वारा हे प्रशिक्षण – मार्गदर्शन हसतखेळत होऊन, अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे ठरले. या प्रशिक्षणास गोवा, कोकण, उत्तर महाराष्ट्र (खान्देश) व विदर्भातील पत्रकार उपस्थित होते. यशस्वीतेकरिता गौरी कुलकर्णी, ज्योत्सना सोनकुसरे यांच्यासह संपूर्ण सम्यकच्या चमूने परीश्रम घेतले.
















