धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील भाजप कार्यालयाच्या ओट्यावर काळ्याजादू सारखा प्रयोग झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या व्यापारी संकुलात भाजपचे शहर कार्यालय आहे. कार्यालयालागून शिवपूजा नावाचे भोजनालय आहे. आज सकाळी साधारण ८ वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे भोजनालय चालवणारा भूषण महाजन हा तरुण आल्यावर त्याला भाजप कार्यालयाच्या ओट्यावर राख आणि त्यात काळी उडीत डाळ, तांदूळ, ज्वारीचे दाने तसेच काही नखे दिसून आली. एवढेच नव्हे तर राखेत काही तरी आकृती देखील काढलेली होती.
भेदरलेल्या भूषणने लागलीच भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना फोन लावत हकीगत सांगितली. त्यानंतर संबधित काळ्या जादूची सामुग्रीवर कागद आणि पुठ्ठा टाकून आग लावली आणि नंतर झाडू मारून संबंधित घाण फेकून दिली. दरम्यान, ही राख स्मशानभूमीतील होती की, अन्य ठिकाणची?, यावरूनही परिसरात एकच चर्चा रंगली होती. दरम्यान, हा प्रकार खरचं काळ्या जादूचा प्रयोग होता की, कुणाचं खोडसाळपणा हे समोर येणे गरजेचे आहे.
भाजपचे पदाधिकारी कार्यालयात आल्यानंतर यावर चर्चा झाली. परंतू आज शिवजयंती असल्यामुळे उद्या या विषयावर पुन्हा बैठक घेतली जाणार असून पोलिसात तक्रार द्यायची किंवा नाही?, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुका जवळ आल्यानंतर अशी घटना उघडकीस आल्यानंतर चर्चेला उधाण आले होते. तर धरणगावच्या इतिहासात असा प्रकार कधीही घडला नसल्याचे बोलले जात आहे.
घटनेची माहिती आम्हाला सकाळीच मिळाली होती. परंतू आज शिवजयंती महोत्सव असल्यामुळे आम्ही या विषयाकडे दुर्लक्ष केले. परंतू उद्या याबाबत पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पोलिसात तक्रार देण्यात बाबत निर्णय घेऊ. राजकारण हे खुल्या दिलाने आणि जनतेच्या दरबारात झाले पाहिजे, अशा पद्धतीने काळ्याजादूचे प्रयोग करून निवडणुका जिंकता येत नाहीत?, हे काही मूर्ख लोकांना समजत नाही. आम्ही अशा गोष्टींना भिक घालत नाही.
-कमलेश तिवारी (ज्येष्ठ नागरिक जिल्हाध्यक्ष)