नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतासह जगभरातील अनेक देशांची सरकारे राष्ट्रीय सुरक्षेशी काहीही संबंध नसतानाही हेरगिरीच्या साधनांचा कसा वापर करू शकतात, हे द वायर आणि सहकारी माध्यम संस्थांनी केलेल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारितेतून समोर आले आहे. हॅकिंगद्वारे भारतातील मंत्री, पत्रकार, न्यायमूर्ती आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवण्यासाठी त्यांचे फोन हॅक करण्यात आले असण्याची शक्यता या माध्यम संस्थांच्या ‘प्रोजेक्ट पिगॅसस’मध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
इस्रायली कंपनीच्या विविध सरकारी ग्राहकांनी पाळत ठेवण्यासाठी वापरलेल्या जगभरातील हजारो फोन नंबरच्या रेकॉर्डच्या द वायर आणि सहकारी माध्यम संस्थांनी केलेल्या पडताळणीत हे उघड झाले आहे, की २०१७ आणि २०१९ दरम्यान एका अज्ञात भारतीय एजन्सीने पाळत ठेवण्यासाठी ४० भारतीय पत्रकारांची निवड केली होती. उघड झालेल्या माहितीनुसार हे स्पष्ट होत आहे, की हिंदुस्तान टाइम्सचे संपादक शिशिर गुप्ता यांच्यासह इंडिया टुडे, नेटवर्क १८, द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस यांसारख्या भारतातील मोठ्या माध्यम संस्थांचे पत्रकार हॅकिंगसाठी निशाण्यावर होते.
यांमध्ये द वायरच्या दोन संस्थापक संपादकांसह तीन पत्रकार, दोन नियमीत लेखकांची नावे आहेत. यामध्ये रोहिणी सिंग यांचे नाव आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या उद्योगाविषयी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे व्यावसायिक निखिल मर्चेंट आणि बडे प्रस्थ असणारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उद्योगपती अजय पिरामल यांच्याबरोबर झालेल्या व्यवहारांच्या बातम्या दिल्यानंतर रोहिणी सिंग यांना टार्गेट करण्यात आले होते. इंडियन एक्सप्रेसमध्ये सह संपादक असणारे एक अन्य पत्रकार सुशांत सिंग यांच्यवर लक्ष ठेवण्यात आले होते. ते २०१८ मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या राफेल व्यवहारांची तपासणी करीत होते.
लिस्टमध्ये सामील असणारे बहुतांशी पत्रकार राजधानी दिल्लीतील असून, मोठ्या संस्थांशी संबंधीत आहेत. ज्यामध्ये हिंदुस्तान टाइम्स समूहातील सध्याच्या चार आणि एका माजी पत्रकारावर पिगॅससच्या भारतातील ग्राहकाने नजर ठेवली होती. यामध्ये कार्यकारी संपादक शिशिर गुप्ता, संपादकीय पानाचे संपादक आणि माजी ब्यूरो चीफ प्रशांत झा, संरक्षण क्षेत्रात बातमीदारी करणारे राहुल सिंग, कॉँग्रेस कव्हर करणारे माजी राजकीय बातमीदार औरंगजेब नक्शबंदी आणि याच समूहाचे वृत्तपत्र ‘मिंट’च्या एका बातमीदाराचा समावेश आहे.
अन्य प्रमुख माध्यम संस्थांमध्ये काम करणाऱ्या कमीत कमी एका तरी बातमीदाराचा फोन नंबर या लिस्टमध्ये दिसून येत आहे. यामध्ये इंडियन एक्सप्रेसच्या ऋतिका चोप्रा (ज्या शिक्षण आणि निवडणूक आयोगायची बातमीदारी करतात) इंडिया टुडेचे संदीप उन्नीथन (जे संरक्षण आणि लष्करासंबंधी बातमीदारी करतात), टीवी १८ चे मनोज गुप्ता (जे शोध पत्रकारीता आणि संरक्षण संबंधांचे संपादक आहेत), द हिंदूच्या विजेता सिंग (ज्या गृह मंत्रालयांची बातमीदारी करतात) यांचा समावेश आहे. यांच्या फोनवर पाळत ठेवण्यात आल्याच्या प्रयत्नांचे पुरावे मिळाले आहेत.
‘पिगॅसस’ काय आहे?
जगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पिगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पिगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे, अशा बातम्या २०१९मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हॉटस अॅप या समाज माध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था- ‘एनएसओ’ला न्यायालयात खेचण्याचा इशारा २०१९च्या ऑक्टोबरमध्ये दिला होता.