नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच देशात दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. गेल्या २४ तासात देशात १ लाख १५ हजार ७३६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात नोंदवलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. तसेच कोरोना सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.
देशातील रुग्णांची एकूण संख्या १ कोटी २८ लाख १ हजार ७८५ इतकी झाली आहे. गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८९४ रुग्णांची नोंद झाली होती. कोरोनाकाळातील ती सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. मात्र, आता महाराष्ट्रासह अन्य राज्यांत वेगाने रुग्णवाढ नोंदविण्यात येत असून नवा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. दरम्यान देशातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ८ लाख ४३ हजार ४७३ वर पोहोचली आहे.
कोरोना सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय गेल्या २४ तासात ६३१ मृत्यू झाले आहेत. भारतात आतापर्यंत १ लाख ६६ हजार १७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १ कोटी १७ लाख ९२ हजार १३५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत ८ कोटी ७० लाख ७७ हजार ४७४ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
दरम्यान महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ५५ हजार रुग्णांची नोंद झाली असून दिल्लीत ५१०० नवे रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.