मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले. अशी प्रतिक्रया काँग्रेसचे नेते आणि महाविकासआघाडीतील कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
राहुल गांधींमध्ये सातत्याचा अभाव असून पक्षात त्यांची स्वीकारार्हता आहे का हे पहावे लागेल, असं वक्तव्य शरद पवारांनी नुकतेच एका मुलाखतीत केले होते. त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिलं आहे. शरद पवार यांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो. मात्र, ते राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले असं वाटतं, असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. सोबतचं काँग्रेसजनांना जे वाटले ते त्या बोलल्या, असे म्हणत मंत्री यशोमती ठाकूर यांच्या भूमिकेचंही समर्थन केलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं होतं. त्यावर “सरकार स्थिर राहावं असे वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्त्वावर बोलणं टाळावं,” असं ट्वीट काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि राज्याच्या महिला-बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. त्यानंतर आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही आपली नाराजी बोलून दाखवली. बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की, राहुल गांधींना पक्षात स्वीकारार्हता आहे, आमचे ते नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेस पुन्हा संघटित होते आहे. राहुल गांधींनी जीवनात जे दुख पाहिले, त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही उभे राहून ते नेतृत्व करतायत. पुढील काळातही ते समर्थपणे नेतृत्व करणार आहेत.’
राहुल गांधी करत असलेल्या कामाच्या विरोधात भाजपच्या प्रचार यंत्रणा काम करतात. राहुल गांधी पुढची वाटचाल यशस्वी करणार आहेत. त्यावर आमचा विश्वास आहे. शरद पवारांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो. मात्र ते राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले असं वाटतं. असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.
















