विरार (वृत्तसंस्था) कपडे वाळत घालण्यावरुन शेजाऱ्यांशी चाललेल्या वादात साथ न दिल्यामुळे पतीने पत्नीची चाकूने भोकसून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईजवळच्या विरार पूर्वेच्या फुलवाडा परिसरात ही विचित्र घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीचा शोध घेत आहेत.
जगदीश गुरव असं गुन्हा दाखल झालेल्या ३५ वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे. आरोपी जगदीश यांची पत्नी सुप्रिया (वय-२५) या गेल्या आठवड्यात आपल्या माहेरी गेल्या होत्या. पत्नी माहेरी गेल्याने जगदीश घरी एकटाच होता. दरम्यान, कपडे सुकायला घालण्यावरून शेजाऱ्यांशी वाद झाला. या किरकोळ वादातून त्याची शेजाऱ्यांशी किरकोळ हाणामारी झाली.
बायकोला भोसकलं, सासूवरही वार
त्यामुळे आरोपीने तावातावात आपल्या पत्नीला फोन करत घटनेची माहिती दिली. तसेच ‘तू लवकर घरी ये, आपल्याला भांडायला जायचंय’ असं सांगितलं. पण माहेरी असलेल्या पत्नीने दोन-तीन दिवसात घरी येते, असं सांगत वाद न वाढवण्याचा सल्ला दिला. पण शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणात पत्नीने साथ न दिल्याने आरोपी जगदीशला राग अनावर झाला. यामुळे तो थेट सासुरवाडीत गेला आणि पत्नीशीच वाद घालायला सुरुवात केली. दरम्यान भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या सासुलाही त्याने मारहाण केली.
सुप्रिया यांचा जागीच मृत्यू
यानंतर स्वयंपाकघरातील चाकू आणून आरोपीने पत्नीच्या छातीत सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की या दुर्दैवी घटनेत सुप्रिया यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी सासूने विरार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.