मुंबई (वृत्तसंस्था) शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी अस करायला नको होतं. त्यांचा केवळ एका मताने पराभव झाला आहे. हार जीत ही होत असते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँके निवडणुकीतील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत आमची एकहाती सत्ता आली आहे. असंच चित्र राज्यभरात पाहिला मिळत आहे. बँक हातात आल्यामुळे आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आलो आहे” असे त्यांनी सांगितले.
जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीत दहा जागांसाठी ९४.८ टक्के मतदान झाले. दोन हजार ८५३ मतदारांपैकी दोन हजार ६८४ मतदारांनी आपला हक्क बजावला. मुक्ताईनगर तालुक्यात सर्वाधिक शंभर टक्के मतदान झाले होते. दरम्यान साताऱ्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघातून सहकार पॅनेलचे उमेदवार शशिकांत शिंदे एका मताने पराभूत झाले. त्यानंतर आमदार शशिकांत शिंदेच्या समर्थकांनी राष्ट्रवादी भवनावर दगडफेक केली.
याबद्दल बोलताना खडसे म्हणाले की, शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी अस करायला नको होतं. त्यांचा केवळ एका मताने पराभव झाला आहे. हार जीत ही होत असते. परंतु एकूणच सगळे निकाल पाहिले तर महाविकास आघाडी निवडून आली आहे. अजूनही मतमोजणी सुरू आहे” असे खडसे म्हणाले.