मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले असून तुफान राडा झाला आहे. राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादन बाबतीतील आरोपांबाबत भाजपाने शिवसेना भवनासमोर आंदोलन केलं, यावेळी भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. कारण शिवसेनेच्या कार्यकर्तेदेखील शिवसेनाभवन बाहेर प्रत्युत्तर देण्यासाठी जमा झाले होते, भाजपा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चेकरी जमा झाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाच्या परिसरात गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी शिवसेनेचे नेते सदा सरवणकर आणि इतर शिवसैनिक हजर होते. पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. पण, दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि शिवीगाळ केली असा आरोप केला आहे. पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते आणि व्हॅनमधून नेत होते, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केली असा आरोप शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी केला.
भाजपा कार्यकर्ते शिवसेना भवनवर हल्ला करणार होते – सदा सरवणकर
“भाजपाचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते शिवेसना भवनात जमले होते. पण जेव्हा भाजपाचे काही कार्यकर्ते विटा, दगडं घेऊन शिवसेना भवनवर हल्ला करण्यासाठी येत आहेत अशी माहिती मिळाली तेव्हा शिवसैनिक संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांनी त्यांना थाबवलं असता बाचाबाची झाली. शिवसेना भवनावर हल्ला करण्याची भाजपाची योजना होती,” असा आरोप स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे.
तर, भाजपच्या कार्यकर्त्यांनी विनाकारण आंदोलन केले होते, त्यांनी शिवसेनेच्या भवनावर जाण्याचा प्रयत्न केला. जर कुणी शिवसेना भवनात घुसण्याचा प्रयत्न करणार असेल तर शिवसैनिक आपल्या स्टाईलने उत्तर देईलच, ही त्यांची भावना आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
तर भाजपचे कार्यकर्ते हे शांतपणे आंदोलन करत होते. सामनामध्ये लिहिलेल्या अग्रलेखाच्या विरोधात शांतपणे आंदोलन करण्यात येत होते, पण शिवसैनिकांनीच कार्यकर्त्यांवर हल्ला केला, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.