ठाणे (वृत्तसंस्था) शिवसेनेचे माजी महापौर व माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचं निधन झालं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु आज पावणे पाचच्या सुमारास त्यांंची प्राणज्योत मालवली. ते ६७ वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, सून, नातवंडे आणि भाऊ असा परिवार आहे. ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
अनंत तरे हे ठाण्याचे माजी महापौर होते. त्यानंतर २०००मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले होते. २००८मध्ये त्यांची शिवसेना उपनेते म्हणून निवड करण्यात आली. २०१५ मध्ये त्यांची पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. ते कोळी समाजाचे नेते होते. शिवाय एकविरा देवी ट्रस्टचेही अध्यक्ष होते. राजकारणाबरोबरच त्यांचं सामाजिक चळवळीती योगदान मोठं होतं. त्यांच्या जाण्याने ठाणे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. ठाण्यात सलग तीन वेळा महापौरपद भूषविण्याचा विक्रम अनंत तरे यांच्या नावावर आहे. त्यांनी १९९३ मध्ये पहिल्यांदा महापौरपद भूषविलं. त्यानंतर १९९४ आणि १९९५ सालीही महापौरपद भूषविलं होतं. ठाण्यात महापौरपदाची हॅट्रीक साधणारे ते एकमेव नगरसेवक होते. २०००मध्ये विधान परिषदेवर ते निवडून गेले होते. त्यानंतर २००६ मध्येही ते विधान परिषदेसाठी उभे होते. मा६, यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर २०१४च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापल्याने ते नाराज झाले होते.
अनंत तरे यांना ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या दुपारी २ वाजता ठाण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे ठाणे जिल्हा एका मोठ्या नेत्याला मुकल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.