नाशिक (वृत्तसंस्था) राज्यासह नाशिक शहरात कोरोनाचा कहर सुरू असताना, आता वेगळ्याच बातमीने नाशिककरांची चिंता वाढली आहे. नाशिक शहरात चक्कर येऊन पडल्याने एकाच दिवसात ९ जण दगावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपूर्वीही चक्कर आल्याने चौघा जणांचा २४ तासांत मृत्यू झाला होता.
नाशिकमधील नव्या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचा आकडा एका दिवसात नऊवर गेला आहे. तर गेल्या तीन दिवसांतील आकडा १३ वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे मृतांमध्ये तरुणांचाही समावेश आहे. याआधी कोणाचा रस्त्याने पायी जाताना मृत्यू झाला होता, तर कोणाला राहत्या घरीच चक्कर आली होती. गेल्या काही दिवसात उष्णतेचा पारा चांगलाच वाढला आहे. नाशिक शहराचं तापमान वाढून ४० अंशाच्या पार पोहोचलं आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास होऊन मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या उन्हामुळे चक्कर येऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज याआधीही वर्तवण्यात आला होता. परंतु मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या नव्या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेल्या महिनाभरात जवळजवळ पन्नासहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याने प्रशासनासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या तुटवड्याने कोरोना बाधितांच्या मृत्यूतही वाढ होत आहे.
दरम्यान, चक्कर येऊन पडल्याने शनिवारी चौघांचा नाशिकमध्ये मृत्यू झाला होता. इंदिरानगर, उपनगर, श्रमिकनगर आणि देवळाली गावात या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी संबधित पोलीस ठाण्यांमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.