मुंबई (वृत्तसंस्था) संजय राऊत, एकनाथराव खडसे यांचे फोन ‘समाजविघातक घटक’ या नावाखाली टॅप होत होते, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तपासात एक पत्र समोर आलं होतं. गृहविभागाच्या सचिवांना फोन टॅपिंगच्या परवानगीसाठी लिहीलेल्या या पत्रात संजय राऊत, एकनाथराव खडसे यांचे फोन नंबर होते. मात्र त्यांच्या नावापुढे नावं न देता समाजविघातक घटक असं नमूद करण्यात आलं होतं, अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणात एकनाथ खडसेंचा फोन 67 दिवस, तर संजय राऊतांचा फोन 60 दिवस टॅप झाल्याची माहिती आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा तातडीच्या आधारावर संजय राऊत यांचा सात दिवस फोन टॅप करण्यात आला आणि दुसऱ्यांदा एसीएस होमच्या परवानगीने 60 दिवस फोन टॅप करण्यात आला. मुंबई पोलिसांनी तत्कालीन एसीएस होम एस कुमार यांचा जबाबही नोंदवला आहे. एकनाथराव खडसे आणि संजय राऊत यांचं नाव एसआयडीच्या स्वरुपात फोन टॅपिंगच्या विनंतीमध्ये असल्याचं कुमार यांनी आपल्या जबाबात सांगितलं होतं. महत्त्वाचं म्हणजे एकनाथराव खडसे किंवा संजय राऊत यांचा फोन टॅप होत असल्याचं कोणालाही कळू नये म्हणून एसआयडीकडून चुकीच्या नावानं विनंती करण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दहा पेक्षा अधिक जणांचे जबाब नोंदवले आहेत. एवढेच नव्हे तर, म्हणजे एकनाथराव खडसे आणि संजय राऊत या दोघांचेही जबाब नोंदविण्यात आले आहे.
















