चंदिगढ (वृत्तसंस्था) दिवाळीच्या आदल्या दिवशी बाजारपेठेत किरकोळ खरेदीसाठी गेलेल्या तरुणाचा पाठलाग करून काही गुंडांनी चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
हरियाणातील रेवाडीमध्ये राहणारा अमित नावाचा तरुण रिक्षा चालवून आपला चरितार्थ चालवत असे. त्याच्या नावावर असणाऱ्या एका वडिलोपार्जित जागेवरून त्याचे आणि त्याच्या चुलत्याचे वाद होते. शहरातील एक जागा अमितच्या वडिलांनी त्याच्या नावे केली होती. मात्र त्या जागेवर अमितच्या चुलत्याने दावा केला होता. याच वादातून त्याने अमितवर जीवघेणा हल्ला केल्याचं मानलं जात आहे.
अमित संध्याकाळी दिवाळीची मिठाई घेण्यासाठी दुकानात गेला होता. मिठाई घेऊन तो घरी गेला आणि पुन्हा काही किरकोळ खरेदी करण्यासाठी बाजारात गेला. रात्री सुमारे साडेदहा वाजता काही गुंडांनी अमितवर हल्ला केला. त्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी तो तिथून पळाला आणि एका सुनसान गल्लीत लपला. तिथंही गुंडांनी त्याचा पाठलाग केला आणि जबर मारहाण केली. त्यांच्या तावडीतून पुन्हा एकदा सुटलेल्या अमितने आणखी एका बोळात लपून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथंही गुंडांनी गाठत त्याच्या छातीत चाकूनं वार करून त्याचा बळी घेतला. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अमितचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. आपल्या भावानेच आपल्या मुलाचा जागेच्या वादातून बळी घेतल्याचा आरोप अमितच्या वडिलांनी केला आहे.