चंद्रपूर (वृत्तसंस्था) शेतालगतच्या झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून पत्नीच्या डोळ्यासमोरच पतीला ओढत नेत ठार केल्याची अंगाचा थरकाप उडवणारी घटना तालुक्यातील पांढराबोडी शेतशिवारात मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. वाघाच्या हल्ल्यासमोर पत्नीने हंबरडा फोडला, आक्रोश केला. शेजारचे शेतकरी आणि गावकरी मदतीसाठी आले. मात्र तोपर्यंत पतीचा बळी गेला होता. ईश्वर गोविंदराव कुंभारे (४५, रा. मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
सावरगावपासून एक किमी अंतरावर असलेल्या तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या बोडचा बिटातील पांढराबोडी शेतशिवारात शेतकरी ईश्वर आपल्या पत्नीसह शेतकामासाठी गेले होते. दोघेही पती पत्नी शेतात काम करीत असताना दुपारच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक या दाम्पत्यावर हल्ला चढवला. यावेळी वाघाने पत्नीसमोरच पतीवर झडप घालून त्याला ओढत नेले. पत्नीने आरडाओरड केली असता आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली. गावालगतच शेत असल्यामुळे गावातील काही नागरिकही धावून आले. मात्र वाघाच्या तावडीतून ईश्वरची सुटका होऊ शकली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. यावेळी तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, वनपाल चंद्रकात रासेकर व वनरक्षक तसेच गावकरी उपस्थित होते. दरम्यान, सायंकाळपर्यंत वनविभागाने शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत केलेली नव्हती. गावकऱ्यांनी याबाबत चंद्रकांत रासेकर यांना भ्रमणध्वनीवर दोनदा संपर्क साधला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ईश्वरच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. मृत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.