मुंबई (वृत्तसंस्था) वडेट्टीवार यांनी कोरोनाची सद्यस्थिती मांडून लोकलबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. लोकल ट्रेनबाबत कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यावा लागणार आहे आणि जो काही निर्णय असेल तो स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तज्ज्ञांशी व संबंधितांशी चर्चा करून घेणार आहेत, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
मागील दीड वर्षाहून अधिक काळापासून देशभर कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध निर्बंध लादले आहे. याचाच एक भाग म्हणून सरकारने मागील काही महिन्यांपासून मुंबई लोकल ट्रेनची दारं सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. पण आता राज्यात कोरोना रुग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे लोकल ट्रेनचा प्रवास सर्वसामान्य नागरिकांसाठी कधी सुरू होणार याकडे सर्वाचे लक्ष लागलं आहे. याबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना विचारलं असता त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत काही सूचक विधानं केली आहेत.
त्यांनी सांगितलं की, सध्या राज्यात कोरोना स्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र कोरोना विषाणूचा धोका अद्याप कमी झालेला नाही. दररोज नव्यानं कोरोनाबाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या अजूनही मोठी आहे. पहिल्या लाटेत जो कोरोना रुग्णांचा उच्चांक होता, त्या आकड्यावर सध्या कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोकाही वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत वस्तुस्थितीचा योग्य आढावा घेतल्यानंतरचं निर्बंध हटवण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.
यावेळी वडेट्टीवार यांनी कोरोनाची सद्यस्थिती सांगून लोकलबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. लोकल ट्रेनबाबत कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यावा लागणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा करणं अपेक्षित आहे. चर्चेनंतर जो काही निर्णय घेण्यात येईल याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः जनतेला देतील. दर शुक्रवारी टास्क फोर्सद्वारे राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जातो. त्यानंतर निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेतला जातो. त्यामुळे तूर्तास लोकलबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे लोकलनं प्रवास करण्यासाठी सर्वसामान्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. सध्या लोकलनं प्रवास करण्याची मुभा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच आहे.