चोपडा (प्रतिनिधी) शहरातील ६७ वर्षीय प्रौढाला सर्पदंश झाल्यानंतर त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान या प्रौढाचा मृत्यू झाला. तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप, संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी करुन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यामुळे या परिसरात तणाव वाढल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
शहरातील मोठा माळी वाड्यातील रहिवासी पुंडलिक गोबाळू माळी (वय ६७) यांना नागलवाडी शिवारात दुपारी १ वाजता शेतात काम करताना साप चावल्याने त्यांना नातेवाईकांनी चोपडा उपजिल्हा रुग्णलयात दाखल केले. डॉ. धनंजय अठरे व डॉ. तृप्ती पाटील यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र, काही तासातच रुग्णाचा मृत्यू झाला.
या वेळी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्या प्रौढाचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत रुग्णाच्या नातेवाईकांनी केला. तर दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, पुंडलिक गोबाळू माळी हे १ रोजी शेतात काम करत होते. काम करतांना दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांना साप चावला. त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केले. परंतु, उपचारादरम्यान पुंडलिक माळी यांचा मृत्यू झाला. परंतु डॉक्टर वेळेवर आले नाहीत म्हणून माळी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक महाजन यांनी करुन प्रशासनाला धारेवर धरले. या वेळी काही काळ रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अतिशय विषारी साप रुग्णाला चावला रुग्णाला दवाखान्यात तेव्हा ते गंभीर होते. परंतु, उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. पण काही हलगर्जीपणा झाला असेल, तर त्याची चौकशी करू, अशी प्रतिक्रिया चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश पाटील यांनी दिली आहे.