मुंबई (वृत्तसंस्था) एमआयएमने युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर शिवसेना नेतृत्वाला जनाब ठाकरे म्हणून डिवचणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या विधानपरिषदेच्या आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीसांचा फोटो पोस्ट करत ज्यात फडणवीसांच्या नावासमोर जनाब असं लिहीलं आहे. हा फोटो पोस्ट करत मनिषा कायंदे यांनी चादर चढवताना स्वाभिमान झुकला नाही का? असा बोचरा प्रश्न विचारला आहे.
“आम्ही पाहतो आहोत की सत्तेसाठी ते आणखी काय करतात? तसंही आता शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारलेलं आहे आणि अजानची स्पर्धा वैगरे सुरू आहे, त्याचा परिणाम आहे का पाहूयात,” असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. यावरुन शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार मनिषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. मनिषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीसांचा फोटो ट्वीट करत आताच जनाब या शब्दाबद्दल एवढा राग? का असा सवाल केला आहे.
“जनाब देवेंद्र फडणवीसजी, तेव्हा तुम्ही जनाब शब्दाबद्दल आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. चादर चढवताना आपला स्वाभिमान वाकला/झुकला नाही का? आताच का या शब्दाबद्दल एवढा राग? अरे हो, १०५ आमदार निवडूनही भाजपा सत्तेत नाही, यामुळे तुमची अस्वस्थता आहे. नाही का?,” असे टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे.