चंद्रपूर (वृत्तसंस्था) दिवंगत समाजसेविका डॉ.शीतल आमटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज आनंदवन येथे त्यांच्या समाधीस्थळी एका श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या श्रद्धांजली सभेला पुन्हा एकदा आमटे आणि करजगी परिवारातील वादाची किनार दिसून आली. मात्र शीतल आमटे यांच्या शोकसभेला आमटे कुटुंबीय उपस्थित न राहिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
डॉ.शीतल आमटे यांच्या मृत्यू नंतर त्यांचे सासू-सासरे म्हणजे शिरीष आणि सुहासिनी करजगी यांनी फेसबुक वर एक पोस्ट लिहून आमटे परिवारावर अनेक गंभीर आरोप केले होते. या पोस्टमुळे डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले होते. हे सर्व वाद बाजूला ठेवून आमटे कुटुंबीय या श्रद्धांजली सभेला हजेरी लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती मात्र आमटे कुटुंबियांच्या गैरहजेरीमुळे हे वाद अजूनही कायम असल्याचेच पुन्हा एकदा दिसून आले. मात्र फेसबुकवर लिहिलेल्या पोस्ट बाबत आणि आमटे कुटुंबियांच्या गैरहजेरी बाबत करजगी परिवाराने काहीही बोलण्यास नकार दिलाय. मात्र, शीतल यांच्या रुपाने आनंदवनशी संबंध जोडल्या गेल्याची भावूक प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर रोजी आनंदवन येथील त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. शीतल यांनी आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेतलं होतं. त्यानंतर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्यापूर्वीच शीतल यांची प्राणज्योत मालवली. शीतल आमटे आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला.