मुंबई (वृत्तसंस्था) राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाविरोधात एसटी महामंडळाची मोठी कारवाई केली आहे. राज्यभरातील ४५ आगारातील ३७६ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. मात्र तरीही, मागण्या पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय संप मागे घेणार नाही याबाबत कर्मचारी ठाम आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचं राज्यशासनात विलीनीकरण करा ही मागणी घेऊन राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी सध्या आंदोलन करत आहेत. यासाठी समिती स्थापन करून त्यावर तोडगा काढण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र तरीही कर्मचारी आपल्या मागण्या घेऊन आंदोलन करत आहेत. त्यानंतर आता एसटी महामंडळाकडून कठोर कारवाईची भूमिका घेण्यात आली आहे. महामंडळाने संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात निलंबनाच्या कारवाईला सुरूवात केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यभरात संप सुरू आहे. त्यानुसार महामंडळाने संपावर गेलेल्या ३७६ कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. यामध्ये राज्यातील ४५ आगारातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्य सरकारने जीआर काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतला नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं समजतं आहे.