नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब प्रदेशाध्यक्षपदी निवड करून काँग्रेसने गटबाजी शमविली आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते. आता सिद्धू हे आक्रमक झाले असून, त्यांनी पक्षातील ६२ आमदारांना घेऊन आज सुवर्णमंदिर गाठले. सिद्धू यांनी आज केलेल्या या शक्तिप्रदर्शनामुळे पंजाबमध्ये तेच कॅप्टन असल्याचे सिद्ध झाले आहे.
सिद्धू यांनी आज ६२ आमदारांसह सुवर्णमंदिराला भेट दिली. काँग्रेसचे एकूण ७७ आमदार असून, केवळ १५ आमदार या वेळी हजर नव्हते. यामुळे ते मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या गटातील असल्याचे मानले जात आहे. पक्ष नेतृत्वाने सिद्धू यांना बढती देऊन मुख्यमंत्र्यांना शह दिल्याचे मानले जात आहे. पक्ष नेतृत्वाच्या वरदहस्तामुळे सिद्धू यांनी पक्षातील बहुतांश आमदार आपल्याकडे वळवून घेतले आहेत.
मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, आता सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.
पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याचबरोबर चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. हिंदू आणि दलित असा समतोल साधत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात संगतसिंग गिलझियान, सुखविंदरसिंग डॅनी, कुलजित नागरा आणि पवन गोयल यांचा समावेश आहे.
२००४मध्ये भारतीय जनता पक्षाकडून अमृतसरमधून लोकसभेची निवडणूक जिंकून सिद्धू यांनी राजकीय इनिंग सुरू केली. मात्र, महत्त्वाकांक्षा पूर्ण होत नसल्याने २०१७मध्ये ते काँग्रेस पक्षात दाखल झाले. त्यांना मंत्रिपदही मिळाले; परंतु हवे ते स्थान मिळत नसल्याने त्यांची अस्वस्थता कायम राहिली. त्यातूनच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि अमरिंदरसिंग यांच्या विरोधात आघाडी उघडली. दारू आणि ड्रग्जमाफिया यांच्या विरोधात अमरिंदरसिंग कारवाई करीत नसल्याचा आणि प्रकाशसिंग बादल यांच्या कुटुंबावरची कारवाई टाळत असल्याचा आरोप त्यांनी केला. अमरिंदसिंग व सिद्धू वादात तोडगा काढण्यासाठी काँग्रेसने नेमलेल्या समितीने सिद्धू यांचे पुनर्वसन करण्याची शिफारस केली; परंतु सिद्धू प्रदेशाध्यक्ष पदासाठी अडून बसले. दबाव वाढविण्यासाठी ‘आम आदमी पक्षा’त जाण्याचे संकेतही त्यांनी ट्विटद्वारे दिले. त्यामुळे अखेर प्रदेशाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. पंजाबमध्ये काँग्रेसची पुन्हा सत्ता आल्यास ते उपमुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा असली, तरी तळागाळात काम करणाऱ्या अमरिंदरसिंग यांचा वारसा ते चालवू शकतील का, हा प्रश्न आहे.