मुंबई (वृत्तसंस्था) कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री आज उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानत माझ्या पक्षातल्या लोकांनीच मला दगा दिल्याची खंत बोलून दाखवली. तर दुसरीकडे औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास आणि उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव” नामकरणास मान्यता देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आलेला आहे. त्यावर कोर्टात निर्णय अपेक्षित असताना उद्धव ठाकरे सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री सहभागी झाले. तर शिवसेनेतर्फे अनिल परब, सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे हे देखील या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता दिली
- राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार.
- कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार.
- अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार.
- ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार.
- विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय.
- निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय.
- शासन अधिसूचना 8 मार्च 2019 अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय.