मुंबई (वृत्तसंस्था) येत्या ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवासाठी सरकार सज्ज झालं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने नवरात्रोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून नवरात्रीत गरबा किंवा दांडीया खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गदी करुन उत्सव साजरा करू नये अशा सूचना राज्य सरकारतर्फे देण्यात आल्या आहे. नवरात्रोत्सव साजरा करताना नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे असे राज्य सरकारने म्हटले आहे. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना लागू करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार नवरात्रोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी पालिकेकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून यासाठी ऑनलाइन सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. यंदा विनाशुल्क परवानगी देण्यात येत आहे. पालिकेने निश्चित केलेल्या आकारमानानुसारच मंडप परवानगी दिली जाणार आहे. पर्यावरणाचा विचार करता मूर्ती शाडूची असावी, सजावट पर्यावरणपूरक असावी, सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार फूट उंचीची, तर घरगुती मूर्ती दोन फूट उंचीची असणेही आवश्यक आहे, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवाकरीता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची व्यवस्था करावी. तसेच आरोग्य विषयक सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा, दांडिया किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रमे/ शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.