यावल (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सक्षम लोकायुक्त कायद्याबाबत तात्काळ लक्ष केंद्रित करावे, अन्यथा अण्णा हजारे यांना या कायद्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन उपोषण करावे लागेल, असे निवेदन भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीने जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील भ्रष्टाचाराला कायमचा आळा घालण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाशिवाय पर्याय नाही लोकशाहीमध्ये कायदा सर्वोच्च असतो. म्हणून व्यवस्था परिवर्तनाला कायदेशीर आधार असावा यासाठी २०१२ मध्ये देशात लोकपाल लोकायुक्त कायद्यासाठी देशातील जनतेने आंदोलन सुरू केले. हे आंदोलन २०१४ पर्यंत चालले. लोकपाल लोकायुक्त आंदोलनाचा देशात ऐतिहासिक परिणाम झाला. करोडो रुपये खर्च करून जे लोकशिक्षण, लोकजागृती झाली नसती अशी लोकशिक्षण लोकजागृती त्यावेळेस झाली होती आणि आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठ्या प्रमाणात लोक निर्भय बनले. लाखो लोक अहिंसात्मक मार्गाने रस्त्यावर उतरल्यामुळे सरकारवर जनशक्तीचा मोठा दबाव निर्माण झाला. दोन वेळा मध्यरात्रीपर्यंत विशेष संसद बसली आणि केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त कायदा करण्याचा ऐतिहासिक ठराव पास केला. अखेर १ जानेवारी २०१४ रोजी केंद्रात लोकपाल कायदा मंजूर झाला. आता महाराष्ट्र राज्यात लोकायुक्त कायदा होणे आवश्यक आहे. मात्र, राज्य सरकार लोकायुक्त कायद्यासाठी चालढकल करीत असल्याचे जाणवते.
त्यामुळे महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे संयुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले राजकीय लक्ष तत्काळ केंद्रित करून समाज हित व लोक हितासासाठी सक्षम लोकायुक्त कायदा करणेबाबत तत्काळ सर्वानुमते निर्णय घ्यावा. आणि तसा निर्णय न घेतल्यास अण्णा हजारे यांना राज्यातील त्यांच्या जिल्हा संघटक आणि सदस्यांसह आणि काही सामाजिक संस्थांच्यामार्फत लोकशाही मार्गाने जन आंदोलन उपोषण करावे लागेल, असा इशाला देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी जळगाव जिल्ह्यातील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जिल्हा संघटक सुरेश जगन्नाथ पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष शेख लतीफ शेख गयास, जामनेर तालुका अध्यक्ष जयराम लक्ष्मण पाटील, चोपडा तालुकाध्यक्ष शांताराम राजाराम पवार, एरंडोल तालुकाध्यक्ष शांताराम पवार, जळगाव येथील सुभाष वाघ, सादिक शहा, नशिराबाद येथील नितीन रंधे, एरंडोल येथील डॉ.प्रवीण वाघ, मालखेड़ा येथील राजेंद्र पाटील, गौडखेड तालुका जामनेर येथील भागवत पाटील आदी जिल्ह्यातील सदस्य उपस्थित होते.