नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली होती. मात्र उत्पादन घटल्याने रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणं कठीण झालं आहेत. दरम्यान, आता थेट केंद्र सरकारने राज्यांना कंपनीकडून रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करावे असं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
“मला तुम्हाला सर्वांना सांगण्यात आनंद होत आहे की, रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन दहा पटीने वाढलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे हे शक्य झालं. ११ एप्रिल २०२१ रोजी दररोज ३३ हजार इंजेक्शनची निर्मिती होत होती. आता हेच उत्पादन साडे तीन लाखांपर्यंत पोहोचलं आहे”, असं ट्वीट मनसुख मंडाविया यांनी केलं आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करणारे कारखाने २० होते. त्यानंतर आता ही संख्या ६० वर पोहोचली आहे. त्यामुळे मागणीपेक्षा जास्त पुरवठा होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अंसही त्यांनी सांगितलं. तसेच नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग एजेंसी आणि सीडीएससीओला रेमडेसिवीरच्या उपलब्धेवर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले आहेत.