गडचिरोली (वृत्तसंस्था) लग्नसमारंभाहून घरी परत येत असताना वीज कोसळून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सोमवार (दि.२४) रोजी पाच वाजताच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेत पती-पत्नीसह दोन चिमुकलींसह चिमुकलींसह आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. भारत राजगडे (वय ३२), अंकिता राजगडे (वय ३०), चिऊ राजगडे (वय २), देवाशी राजगडे (वय ३, सर्व रा. आमगाव, ता. देसाईगंज), अशी मृतांची नावे आहेत.
वडसा तालुक्यातील आमगाव येथील भारत राजगडे हे आपली पत्नी आणि दोन मुलींसह कुरखेडा येथे नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. लग्न समारंभ आटोपून चौघेही दुचाकीवरुन आपल्या घरी परतत होते. मात्र तुळशी फाट्याजवळ पोहचताच अचानक पाऊस सुरु झाला. यामुळे राजगडे कुटुंब पावसापासून वाचण्यासाठी दुचाकी रस्त्यात्या कडेला उभी करुन झाडाखाली थांबले. पण दुर्देवाने ज्या झाडाखाली ते थांबले होते त्याच झाडावर वीज कोसळली आणि अख्खं कुटुंब संपलं. विशेष म्हणजे जिथं दुर्घटना घडली तेथून आमगाव हे अवघं तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर होते. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.