जळगाव (प्रतिनिधी) मामीच्या दशक्रियेच्या विधीसाठी ट्रॅक्टरमधून लाकडे घेवून जात असतांना मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजता नांद्रा गावाजवळ घडली. वासुदेव गोपीचंद सपकाळे (वय ४२, रा. नांद्रा खु.ता. जळगाव), असे अपघात मयत झालेल्या चालकाचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील नांद्रा खु. येथे वासुदेव गोपीचंद सपकाळे हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. गावातच राहणाऱ्या त्यांच्या मामींचे काही दिवसांपुर्वी निधन झाले होते. शुक्रवारी त्यांच्या दशक्रियेचा कार्यक्रम असल्याने लाकडे आणण्यासाठी वासूदेव सपकाळे हे गुरूवारी दुपारच्या सुमारास ट्रॅक्टर घेवून शेताकडे गेलो होते. लाकूडे भरून आणत असताना झाडावर बसलेल्या मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे वासुदेव सपकाळे यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर पलटी होवून ते थेट तापी नदीत कोसळले.
नदीत नदीतील दगडावर आदळल्याने झाला मृत्यू !
ट्रॅक्टर अचानक पलटी झाल्यामुळे वासुदेव पाटील यांचे डोक स्टेअरींमध्ये अडकले. त्यानंतर नदीपात्रात असलेल्या दगडावर ते आदळल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर रुग्णालयात आणत असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
ग्रामस्थांची जिल्हा रुग्णालयात धाव !
अपघातात मयत झालेल्या वासुदेव सपकाळे यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. लाकडे घेण्यासाठी जात असतांना त्यांनी गावातील काही जणांना भेटून ते लाकडे घेण्यसाठी निघाले. परंतु दुर्देवी काळाने त्यांच्यावर झडप घालीत त्यांना हिरावून घेतल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन कोळी यांच्यासह ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतल्याने याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.
दुचाकीवरुन केले रुग्णालयात दाखल !
गावातील तरुण अजय दिलीप सोनवणे हा नदीच्या काठावरील विहीरीजवळ काम करीत होता. ट्रॅक्टर पलटी होवून नदीपात्रात पडल्याचे त्याला दिसताच त्याने आरडाओरड करीत त्याठिकाणी पोहचला. यावेळी चार ते पाच तरुणांनी शर्थीचेप्रयत्न करीत ट्रॅक्टरच्या खाली दाबले गेलेल्या वासुदेव सपकाळे यांना बाहेर काढीत त्यांना दुचाकीवरुन रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेवून गेले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत करताच त्यांच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला